अहमदनगर : शहरात स्मार्ट एलईडी पथदिवे बसविण्यासाठी ठेकेदाराला कार्यारंभ आदेश देऊन तातडीने पथदिवे बविण्यास सुरुवात करावी. प्रभाग क्रमांक १ व ७ मध्ये सर्वप्रथम स्मार्ट एलईडी दिवे बसवावेत, अशी मागणी नगरसेवक डॉ. सागर बोरुडे यांनी सभापती अविनाश घुले यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
महापालिका स्थायी समितीने शहरातील स्मार्ट एलईडी प्रकल्पास मंजुरी दिली. पूर्वीचे जुने पारंपरिक पथदिवे बदलण्यात येणार असून, नवीन एलईडी दिवे बसविण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर नगरसेवक डॉ. सागर बोरुडे यांनी घुले यांच्याकडे वरील मागणी केली आहे. यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, प्रभाग क्रमांक १ व ७ हे दोन प्रभाग विस्ताराने मोठे आहेत. या भागातील पथदिवे बंद आहेत. त्यामुळे परिसरात अंधाराचे साम्राज्य पसरले. या प्रभागांमध्ये घरफोड्यांचे प्रमाण वाढले आहे. तसेच महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावण्याचे प्रमाण देखील वाढलेले आहे. हा भाग एमआयडीसीजवळ आहे. या परिसरातील नागरिकांना एमआयडीसीमध्ये नोकरीसाठी जावे लागते. रात्री-अपरात्री कामावरून घरी येताना अंधारामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे या भागात भुरट्या चाेऱ्या, लूटमारीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे स्मार्ट एलईडी बसविण्याच्या कामास या दोन प्रभागांतून सुरुवात करावी, अशी मागणी बोरुडे यांनी केली आहे.