अहमदनगर : शहरात वाहनांच्या चोरीचे सत्र पुन्हा सुरू झाले आहे. दोन दिवसांपूर्वी एकाच दिवसात सात ते आठ वाहने चोरीला गेली होती. त्यानंतर रविवार-सोमवारी पुन्हा चोरट्यांनी सात ते आठ वाहने चोरली आहेत. स्थानिक गुन्हे शाखेने वाहने चोरणारी जुनी टोळी गजाआड केली असली तरी त्याच टोळीतील जामिनावर सुटलेले आरोपी आणि नव्या टोळ््यांमुळे वाहन चोरांचा शहरात सुळसुळाट झाला आहे. नगर शहरात वाहनांची पार्किंग करण्यासाठी मोजक्याच जागा आहेत. शासकीय कार्यालयाच्या जागेत खासगी संस्थांनी पार्किंगचे ठेके घेतले आहेत. तिथे पैसे आकारले जात असल्याने नागरिक कार्यालयाच्या बाहेरच वाहने पार्किंग करीत आहेत. एस.टी. बसस्थानकात पार्किंगची सुविधा असली तरी तात्पुरत्या कामासाठी जाणाऱ्या लोकांकडून रस्त्यावरच वाहने लावली जातात. न्यायालय, कापड बाजार, मार्केट यार्ड, चितळे रोड, दाळमंडई आदी ठिकाणी जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून शेतकरी, नागरिक येतात. त्यांच्या रस्त्यावर लावलेल्या वाहनांची चोरी होत आहे. नगर-कल्याण रोडवर लावलेली सोमेश्वर मंगल कार्यालयाच्या पार्किंगमध्ये लावलेली सागर किशोर जाधव (रा. लक्ष्मीनगर, कोपरगाव) यांची १ लाख १० हजार रुपये किमतीची मोटारसायकल अज्ञात इसमांनी ८ ते १२ डिसेंबर या कालावधीत चोरली. परसराम मारोती बरबडे (रा. मिरजगाव, ता. कर्जत) यांची १ लाख १० हजार रुपये किमतीची मोटारसायकल कोर्ट गल्लीतून चोरीला गेली. भगवान विठ्ठल वाणी (रा. वाणीनगर) यांची ३ लाख रुपये किमतीची टाटा कंपनीची मालवाहू गाडी अज्ञात चोरट्यांनी चोरली. वाणी यांनी त्यांचे वाहन घराजवळच्या गोठ्यात लावले होते. वैभव सीताराम आव्हाड (रा. शिवनगर, पिंपळगाव रोड) यांची २ लाख ६० हजार रुपये किमतीची कार घरासमोर उभी केली होती. ही कार अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. (प्रतिनिधी)
वाहनचोर शिरजोर... पोलीस बिनघोर
By admin | Updated: December 15, 2015 23:12 IST