अहमदनगर : स्वप्नांशा डिके हिने कोपर्डी घटनेतील अत्याचाराबाबतची चीड तिच्या भाषणातून मांडत थेट मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला. ती म्हणाली, मुख्यमंत्री भाषण देण्यातच धन्यता मानतात. गुन्हेगारांना सहा महिन्यांच्या आत मृत्युदंड द्यावा. आता मराठ्यांची सहनशीलता संपली आहे. मागण्या मान्य करा नाही तर मराठा शांत बसणार नाही.विद्या कांडेकर हिने महिलांवरील अत्याचार आणि शेतकरी आत्महत्या या विषयावर संताप व्यक्त केला. ती म्हणाली, पोलिसांवरील हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत. पोलीस असुरक्षित आहेत. राज्यात जंगलराज सुरू झाले आहे. गणेशोत्सव काळात स्थगित केलेले मोर्चे पुन्हा राज्यात सुरू झाले आहेत. केंद्र व राज्याची कुंभकर्णी झोप मोडण्यासाठी सकल मराठा एक झाला आहे.जयश्री कवडे म्हणाली,कोपर्डी प्रकरणातील गुन्हेगारांना सहा महिन्यांच्या आत मृत्युदंडाची शिक्षा द्यावी. अनुभवी पोलीस अधिकाऱ्यांनी तपास करून दोषारोपपत्र दाखल करावे. भगवा हातात धरणे हे येरागबाळ््याचे काम नव्हे तर त्यासाठी शिवछत्रपतींचे हृदय लागते. आदिती दुसुंगे म्हणाली, अॅट्रॉसिटीमुळे गुंडांची हिम्मत वाढली. महाराष्ट्रात गेल्या अडीच वर्षात खोटे गुन्हे नोंदवून खंडणी मागण्याचे प्रमाण वाढले आहे. या कायद्याचा आधार घेत दहशत निर्माण केली जात आहे. गुंड प्रशासनात धुडगूस घालत आहेत. त्यामुळे सामान्य माणसाचे जीणे कठीण झाले आहे. कायद्यातील कालबाह्य कलमे वगळण्यात यावीत. जात-धर्म न पाहता अन्यायाविरुद्ध आता पेटून उठलो आहोत. मूक मोर्चामध्ये वादळापूर्वीची शांतता असल्याचा इशाराही तिने दिला.अश्विनी जगदाळे म्हणाली, न्याय हक्कांसाठी मराठा एकवटला आहे. जो एकत्र येत नाही तो मराठाच नाही. मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे. शेतकरी लढ्याची दखल घेतली जात नाही, मात्र धोनीच्या शतकाची दखल घेतली जाते. शेतकऱ्याला फक्त फाशी देतो. त्याच्यासाठी काहीच केले जात नाही. शिक्षणात दारिद्र्यरेषा शिकविली गेली नाही. बापट आयोगाच्या माध्यमातून शैक्षणिक व आर्थिक हक्क मिळाले पाहिजेत. ‘डरकाळी फोडून सांग जगाला, एक मराठा, लाख मराठा’ अशी घोषणा करून ती थांबली.
डरकाळी फोडून सांग जगाला... एक मराठा...लाख मराठा...
By admin | Updated: September 24, 2016 00:09 IST