अहमदनगर : शहरातील खड्डेमय रस्त्यावर वारंवार अपघात होत आहेत. यामुळे अनेकांच्या जीवाला धोका आहे. याला सर्वस्वी महापालिकचे अधिकारी, बांधकाम विभाग व ठेकेदार जबाबदार आहेत. त्यांच्यावर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणीच शिवसेनेने तोफखाना पोलिसांकडे केली. रस्त्याचे काम त्वरित सुरू करण्याच्या आश्वासनामुळे नागरिकांनी त्यांचा आक्रमक पवित्रा मागे घेतला.
तोफखाना पोलीस ठाण्यात युवा सेना प्रमुख विक्रम राठोड, उपजिल्हा प्रमुख गिरीश जाधव, माजी महापौर अभिषेक कळमकर उपस्थित होते. त्यांनी पोलीस निरीक्षक गायकवाड यांच्यासमोर महापालिकेतील अधिकारी व ठेकेदार रसिक कोठारी यांना जाब विचारला. शहरातील रस्त्यांची अवस्था खूपच दयनीय झाली आहे. दिल्लीगेट रस्त्याचे काम अपूर्ण ठेवले आहे. त्यामुळे रस्त्यावर वारंवार वाहतुकीची कोंडी होते. अपघात होतात. सर्व रस्त्यावर खड्डे, धूर व धुळीचे साम्राज्य असते. यामुळे सामान्य वाहनचालकांना रस्त्यावरून आपली वाहने चालविणे अवघड झाले आहे. या परिस्थितीकडे लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेने वारंवार आंदोलने केली. मात्र त्याची पालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने कधीच दखल घेतली नाही. त्यामुळे अधिकारी तसेच ठेकेदारावर गुन्हे दाखल करण्यात यावेत. ठेकदर कोठारी यांनी दिल्लीगेट रस्त्यांचे काम विनाविलंब सुरू करण्याचे आश्वासन दिले. अधिकाऱ्यांनी देखील रखडलेली कामे लगेच मार्गी लावण्यात येतील, असे सांगितले.
--
फोटो- ०६ शिवसेना
दिल्लीगेट रस्त्याच्या कामासाठी शिवसेनेने थेट तोफखाना पोलीस ठाणे गाठले. यावेळी अधिकारी, ठेकेदारांशी चर्चा करताना माजी महापौर अभिषेक कळमकर, युवा सेनेचे विक्रम राठोड, गिरीश जाधव.