शंभर हेक्टरपर्यंत सिंचन क्षमता असलेल्या ४० कोल्हापुरी पद्धतीच्या, सिमेंट साठवण बंधाऱ्यांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. त्यामुळे दक्षिण जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. यासाठी स्थानिक कार्यकर्त्यांनी जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांच्याकडे पाठपुरावा केला होता.
पाथर्डी, शेवगाव, जामखेड, नगर, श्रीगोंदा, कर्जत या तालुक्यांतही बंधारे होणार आहेत. यामध्ये पाथर्डी तालुक्यातील कुत्तरवाडी, मिडसांगवी, भालगाव, आल्हाणवाडी, धनगरवाडी, वडगाव, घुमटवाडी, मालेवाडी, शेवगाव तालुक्यातील लाड जळगाव, मुरमी, जामखेड तालुक्यातील धनेगाव, धामणगाव, धोंड पारगाव, नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी, उक्कडगाव येथील बंधाऱ्यांचा समावेश आहे. मंजूर झालेले बंधारेही १२ कोटी रुपये खर्चाचे आहेत. तर, सर्व बंधाऱ्यांची मिळून ९४७ स.घ.मी. इतकी साठवण क्षमता आहे. या बंधाऱ्यांमुळे परिसरातील ३२४ हेक्टर क्षेत्राला लाभ होणार आहे, असे महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाच्या पत्रात नमूद करण्यात आले आहे. श्रीगोंदा तालुक्यातील भावडी येथील बंधाऱ्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाचे संपर्कप्रमुख शहाजी कोरडकर, पाथर्डी तालुक्यातील कुत्तरवाडी तसेच शेवगाव-पाथर्डी आणि राहुरी-पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील बंधाऱ्यांसाठी तुळशीराम सानप यांनी पाठपुरावा केला होता. जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख, राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्याकडे पाठपुरावा केल्याचेही सानप यांनी पत्रकात म्हटले आहे.
-----
या बंधाऱ्यांना अडचण
राहुरी व शेवगाव तालुक्यांतील काही कामे जायकवाडी पाणलोट क्षेत्रात येत आहेत. याबाबत उच्च न्यायालयात एक जनहित याचिका आहे. जायकवाडी प्रकल्पाच्या वरील बाजूला कोणतेही प्रकल्प हाती घेऊ नये, असे न्यायालयाचेे आदेश आहेत. त्यामुळे या भागातील बंधारे निर्बंध उठल्यानंतर होणार असल्याचे सानप यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.