अहमदनगर : समरसता साहित्य परिषदेच्या वतीने सावेडीतील रेणावीकर शाळेत १८ व्या समरसता साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. ९ व १० डिसेंबर रोजी दोन दिवस चालणा-या संमेलनात राज्यभरातील साहित्यित सहभागी होणार आहेत. संमेलनाचे अध्यक्ष गिरीश प्रभुणे तर स्वागताध्यक्ष अॅड. अशोक गांधी असल्याची माहिती सामाजिक समरसता मंचाचे निमंत्रक प्रा. रमेश पांडव यांनी दिली. भटक्या विमुक्तांचे साहित्य व समरसता विषयावर संमेलनात चर्चा व परिसंवाद होणार आहे.९ डिसेंबर रोजी सकाळी साडेआठ वाजता ग्रंथदिंडीने संमेलनास सुरुवात होईल. सकाळी दहा वाजता शिर्डी संस्थानचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन करण्यात येईल. संमेलनाध्यक्ष गिरीश प्रभुणे, माजी संमेलनाध्यक्ष रमेश पतंगे यांची उपस्थिती असेल. त्यानंतर दुपारी दोन वाजता वारसा शौर्याचा, संस्कृतीचा विषयावर परिसंवाद होईल. परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी डॉ. लीला गोविलकर असतील. या परिसंवादात स्वातंत्र्यचळवळ आणि भटके विमुक्तांचे योगदान विषयावर डॉ. चंद्रकांत पुरी सविस्तर माहिती देतील. तसेच नाथ संप्रदाय वा भटके विमुक्त विषयावर डॉ. एस. के. जोगी आणि भटके विमुक्तांच्या कला व जीवनवर डॉ. विजय राठोड यांचे विचार मांडतील. दुपारी सव्वा तीन वाजता मराठी साहित्यातील प्रतिबिंब आणि समरसता विषयावर डॉ. अनिल सहस्रबुद्धे यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद पार पडेल. यामध्ये डॉ. पुष्पा गावित, डॉ. शंकर धडके, डॉ. प्रकाश खांडगे सहभाग असेल. याशिवाय मराठी साहित्यातील भटके विमुक्तांचे चित्रण, भटक्यांची आत्मकथने, भटके विमुक्तांचे पारंपरिक अविष्कार याबाबतही सविस्तर चर्चा करण्यात येईल. डॉ. सुवर्णा रावळ यांचे भटके विमुक्त महिलांचे जीवन व समस्या विषयावर व्याख्यान होईल. तसेच भातू समाजाच्या कार्यकर्त्या वत्सला काळे, मुस्लिम भटके विमुक्त समाजाचे कार्यकर्ते अमीन जामगावकर यांच्या प्रकट मुलाखती घेतल्या जाणार आहेत.
९ व १० डिसेंबरला नगरमध्ये समरसता साहित्य संमेलन ; अध्यक्षपदी गिरीष प्रभुणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 12:27 IST