अहमदनगर : धरण पाणलोटात मुसळधार पाऊस झाल्याने मुळा, प्रवरा नदीला पूर आला आहे. भंडारदरा, मुळा धरणाच्या पाणीसाठ्यात चोवीस तासांत दुपटीने वाढ झाली़ मुळा ४० तर भंडारदरा ४९ टक्के भरले आहे. पुणे जिल्ह्यातील येडगाव धरणातून सोमवारी कुकडी प्रकल्पात २७ हजार क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले़ दरम्यान, प्रशासनाने कोपरगाव, राहुरी, राहाता, श्रीरामपूर, नेवासा, पारनेर, संगमनेरमधील काही भागात दक्षतेचा इशारा दिला आहे़ नाशिक जिल्ह्यात जोरदार पाऊस झाल्याने नांदूर मध्यमेश्वरमधून गोदावरी नदीपात्रात पाणी सोडले आहे. अकोल्यातील कळसूबाई, रतनगड, हरीशचंद्रगडाच्या डोंगररांगात पावसाचे थैमान सुरू होते़ पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे भंडारदरातील पाणीसाठा ५ हजार दशलक्ष घनफुटावर पोहोचला आहे़ तर मुळाचा पाणीसाठा सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास ९ हजार ६०० दशलक्ष घनफृट होता. पुणे जिल्ह्यातील येडगाव धरणातून कुकडी प्रकल्पात २७ हजार २०० क्युसेक वेगाने विसर्ग सुरू असून, त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे़ याशिवाय दौंड पुलावरून १८ हजार १७४ क्युसेक वेगाने विसर्ग सुरू आहे़ पावसाचा जोर सोमवारी कमी झाला़ पण, नद्या व धरणांतील पाण्याची आवक सायंकाळपर्यंत सुरूच आहे़ अकोले तालुक्यातील शेंडी, राजूर, ब्राम्हणवाडा, समशेर, कोतुळ आणि वीरगाव परिसरात ५० मिलीमीटरहून अधिक पावसाची नोंद झाली़ श्रीरामपूर शहरासह उंदिरगाव, बेलापूर आणि टाकळीभान परिसरातही पावसाने चांगलाच जोर धरला आहे़ कोपरगाव शहरासह पोहेगाव, सुरेगाव परिसरातही पाऊस झाला़ राहाता शहरासह पुणतांबा, शिर्डी मंडलात पावसाने थैमान घातले आहे़ याशिवाय जिल्ह्यातील श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, पारनेर, शेवगाव, पाथर्डी, नगर आणि नेवासा तालुक्यात कमी-अधिक प्रमाणात पाऊस झाला आहे़ पुढील २४ तासात अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने व्यक्त केला आहे. जिल्ह्यात ठिकठिकाणी झालेल्या पावसामुळे बळीराजा सुखावला आहे.(प्रतिनिधी)नदीकाठच्या गावांचा संपर्क तुटलागोदावरी नदीच्या काठावरील राहाता, कोपरगाव, श्रीरामपूर, नेवासा तालुक्यातील गावांना दक्षतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.नदी दुथडी भरून वाहत असून, काही गावांचा संपर्क तुटला आहे़ मुळा नदीवरील मांडवे पुल पाण्याखाली गेल्याने पारनेर व संगमनेर तालुक्यातील काही गावांचा संपर्क तुटला आहे़ याशिवाय भीमा नदीकाठच्या गावांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे़९ मंडलात अतिवृष्टी ४सुरेगाव, कोतूळ, समशेरपूर, ब्राम्हणवाडा, शेंडी, अकोले शहर, शिर्डी, राहाता आणि श्रीरामपूर तालुक्यात अतिवृष्टी झाली असून, परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे़
मुळा ४० तर भंडारदरा ४९ टक्के भरले
By admin | Updated: July 12, 2016 00:02 IST