केडगाव : शासनाने शेतकऱ्यांचे कृषी वीज बिल माफ करावे, या मागणीसाठी छावा क्रांतिवीर सेनेच्या वतीने शनिवारी नगर- औरंगाबाद रस्त्यावर पांढरी पूल येथे रास्ता रोको आंदोलन केले.
वाढीव एचपीचे बिल दुरुस्त करून नंतरच बिलाची आकारणी करावी, वीज कायदा २००३ नुसार शेतकऱ्यास होणाऱ्या नुकसानीची भरपाई मिळावी, शेतीसाठी दिवसा वीज, रोहित्र दुरुस्ती, विद्युत वाहिन्या व खांबांची दुरुस्ती करावी, अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. मागण्यांचे निवेदन महावितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता भाऊसाहेब बडे यांनी स्वीकारले.
यावेळी भारतीय जनसंसदचे जिल्हा सरचिटणीस कैलास पटारे यांनी सरकारवर टीका करत निवडणुकीच्या वेळेस खोटी आश्वासने देऊन जनतेची दिशाभूल केल्याचा आरोप केला. तसेच मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला.
छावा क्रांतिवीर सेनेचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब काळे यांच्या अध्यक्षतेखाली आंदोलन करण्यात आले.
यावेळी संघटक साईनाथ बोराटे, उपाध्यक्ष श्रीहरी लांडे, कार्याध्यक्ष बबन वाघुले, संतोष बोरुडे, बाळासाहेब काळे यांच्यासह संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. एमआयडीसी पाेलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक युवराज आठरे व सोनई पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रामचंद्र कर्पे यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
---
२० रास्ता रोको
पांढरी पूल येथे छावा संघटनेच्या वतीने रास्ता रोको करण्यात आला.