अहमदनगर: मालमत्ता कर भरताना शास्तीमाफी सवलत घेण्याची मुदत संपली तरीही बिले मालमत्ताधारकांना मिळालेली नाहीत. अजूनही ही बिले महापालिकेच्या कार्यालयातच पडून आहेत. मनसेच्या नगरसेवकांनी ही बाब उपायुक्तांच्या निदर्शनास आणून दिली. शास्ती माफीचा निर्णय आयुक्तांनी घ्यावा अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे. मार्च ते मे या काळात मालमत्ता कराची बाकी भरली तर मालमत्ताधारकांना ५० टक्के शास्ती माफीची सवलत आयुक्त विजय कुलकर्णी यांनी जाहीर केली होती. नंतर ही मुदत जूनअखेरपर्यंत वाढविण्यात आली. मात्र कराची मागणी करणारी बिलेच मालमत्ताधारकांना मिळालेली नाहीत. त्यामुळे शास्तीमाफीचा लाभ मालमत्ताधारकांना घेता आला नाही. ही बाब मालमत्ताधारकांनी महापौर संग्राम जगताप, स्थायी समितीचे सभापती किशोर डागवाले यांच्या निदर्शनास आणून दिली. महापौरांनी आयुक्तांना निर्णय घेण्याची सूचना केली. डागवाले यांनी मनसेच्या नगरसेवकांना सोबत घेत माळीवाडा प्रभाग कार्यालयात जाऊन खातरजमा केली. उपायुक्त भालचंद्र बेहेरे यांनाही बोलविण्यात आले. पाहणीत जवळपास दीड हजार मालमत्ताधारकांना बिलेच पोहचली नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे या मालमत्ताधारकांना शास्तीमाफीचा लाभ द्यावा. त्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी किशोर डागवाले, गणेश भोसले यांनी केली. शास्तीचा निर्णय महासभेने घेतला आहे. मुदतही महासभेने ठरवून दिलेली आहे. त्यामुळे याबाबतचा निर्णय महासभेनेच घ्यावा असे बेहेरे यांनी सांगितले. तसा प्रस्ताव द्या, त्यावर चर्चा करून निर्णय घेऊ असे डागवाले म्हणाले. शास्ती माफीचा निर्णय हा आयुक्तांचा अधिकार आहे. मालमत्ता कर मागणीची बिले घरपोहच करणे हे मनपाचे काम आहे. ही बिलेच पोहचली नसल्याने शास्ती माफीचा लाभ मिळाला नाही. (प्रतिनिधी)माळीवाडा प्रभाग कार्यालयात मालमत्ता मागणी कर बिले वाटप करणारा कर्मचारी सेवानिवृत्त झाला आहे. त्याचे काम दुसऱ्या कर्मचाऱ्याकडे सोपविण्यात आले. पण त्यानेही बिलांचे वाटप केले नाही. त्यामुळे मालमत्ताधारकांना बिले पोहचली नाहीत. झेंडीगेट, सावेडी व बुरूडगाव येथील प्रभाग कार्यालयातही बिले पडून आहेत, याबाबत बिलांचा आढावा घेण्यात येईल. त्याचा एकत्रित प्रस्ताव तो आयुक्तांना सादर करणार आहे.- भालचंद्र बेहरे, उपायुक्त
मालमत्ता कराची बिले कार्यालयातच
By admin | Updated: July 25, 2014 00:26 IST