मोरेवाडी परिसरात हजार ते बाराशे नागरिकांची लोकवस्ती आहे. मोरेवाडीसह खैरदरा, जांबुत आदी गावांतील ग्रामस्थ व शेतकऱ्यांसाठी मोरेवाडी ते नांदूर खंदरमाळ हा रस्ता महत्त्वाचा आहे. या रस्त्यावरून शेतकरी, विद्यार्थी, कामगार, दूध व उसाच्या वाहनांची ये-जा चालू असते. परिसरात रुग्णालय, महाविद्यालय, बाजारपेठजवळ नसल्याने याच दुरवस्था झालेल्या रस्त्याने प्रवास करावा लागतो. त्यासाठी दुचाकी, चारचाकी वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागते.
नांदूर खंदरमाळ ते मोरेवाडी हा दोन गावांना जोडणारा रस्ता अत्यंत महत्त्वाचा असून या भागातील अनेक छोटे-मोठे शेतकरी असल्याने शेतातील भाजीपाला व इतर वाहनांची वर्दळ सातत्याने सुरू असते. मात्र, या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून रस्ता चिखलमय झाला आहे. पावसाळ्यात या रस्त्यावर पाणी साठून राहत आहे.
......................
मोरेवाडी येथील शेतकऱ्यांना, विद्यार्थ्यांना विविध कामानिमित्त मोरेवाडी ते नांदूर खंदरमाळ या रस्त्याने ये-जा करावी लागते. त्यामुळे या रस्त्यावर वर्दळ जास्त असते. ठिकठिकाणी खड्डे पडल्याने अपघात होण्याची शक्यता आहे. अनेकदा ग्रामस्थांनी मुरूम टाकून खड्डे बुजविले आहेत. संबंधित लोकप्रतिनिधींनी यात लक्ष घालावे.
-विजय सुपेकर, ग्रामस्थ, नांदूर खंदरमाळ