अहमदनगर : भारताचा राष्ट्रीय पक्षी म्हणून ओळख असलेल्या मोरांची संख्या जिल्ह्यात कमालीची घटली असून, वनविभागाने केलेल्या वन्यप्राणी सर्वेक्षणात दहा वनपरीक्षेत्रात अवघे १७० मोर तर १७ लांडोर आढळून आल्या आहेत़ मागील वर्षीच्या तुलनेत काळवीट, लांडगे आणि कोल्ह्यांची संख्या वाढलेली दिसते़ ससे, माकड आणि रानमांजर हे प्राणी तुलनेने कमी आढळून आले आहेत़ वनविभागाने मे महिन्यात श्रीगोंदा, श्रीगोंदा रोहयो,राहुरी, पारनेर, कोपरगाव रोहयो, मिरजगाव रोहयो, कर्जत, अहमदनगर, टाकळी ढोकेश्वर, पाथर्डी, तिसगाव आदी अकरा वनपरीक्षेत्रात वन्यप्राण्यांची गणना केली़ दोन दिवस दिवसभरात आणि रात्री पाणवठ्यांवर पाणी पिण्यासाठी आलेल्या प्राण्यांची टेहाळणी करत ही गणना करण्यात आली़ वनक्षेत्रात झालेली घट, दुष्काळ, मानवी हस्तक्षेप, शिकारीचे वाढलेले प्रमाण आदी कारणांमुळे मोरांसह ससे, रानमांजर,घोरपड, वानर व माकडांची संख्या कमालीने घटली आहे़ अकरा वनपरीक्षेत्रात दोन दिवसांत २३८५ काळवीट आढळून आले असून, सर्वाधिक ७०० काळवीट कर्जत तालुक्यात आढळून आले आहेत़ जिल्ह्यातील प्रत्येक वनपरीक्षेत्रात उन्हाळ्यात वन्यप्राण्यांसाठी पाणवठे तयार केले जातात़ ४८ तासांत प्राणी एकदा तरी पाणवठ्यावर पाणी पिण्यासाठी येतात़ यावेळी त्यांची तेथे उपस्थित असलेले वनकर्मचारी त्यांची प्रजातीनिहाय गणना करतात़ वन्य प्राणी सर्वेक्षणात वनकर्मचाऱ्यांना पारनेर तालुक्यात दोनच बिबटे दिसून आले़ अकोले आणि संगमनेर तालुक्यात बिबट्यांची सर्वाधिक संख्या आहे़ त्या तुलनेत दक्षिण भागात येणाऱ्या वनक्षेत्रात बिबट्यांची संख्या कमी झाली आहे.
मोर घटले....काळवीट वाढले
By admin | Updated: June 23, 2016 01:23 IST