अहमदनगर : पोलीस भरतीच्या पहिल्या दिवशी निम्म्या उमेदवारांनी दांडी मारली होती. काही कारणांमुळे ते येऊ शकले नव्हते. ज्यांनी अर्ज केलेले आहेत, मात्र पहिल्या दिवशी हजर राहू शकले नाहीत, अशा उमेदवारांनी अर्जाद्वारे विनंती केल्यास त्यांना पुन्हा भरती प्रक्रियेत चाचण्या देण्याची शेवटच्या दिवशी संधी दिली जाण्याची शक्यता आहे. याबाबत प्राथमिक पातळीवर विचार सुरू असल्याचे पोलीस अधीक्षक रावसाहेब शिंदे यांनी सांगितले.जिल्ह्यातील १७९ जागांसाठी नऊ हजार उमेदवारांनी अर्ज केले आहेत. प्रत्येक दिवशी दीड हजार उमेद्वारांना बोलविण्यात आले आहे. पहिल्या दिवशी निम्मे उमेदवार गैरहजर होते. काही कारणामुळे त्यांना पहिल्या दिवशी येता आले नाही. मात्र त्यांनी अर्ज केल्यास त्यांना पुन्हा संधी देण्याबाबत विचार सुरू असल्याचे शिंदे म्हणाले. एक-दोन किरकोळ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या, त्या तक्रारींचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून निवारण करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. भरती प्रक्रियेचा तिसरा दिवस सोमवारी पार पडला. यामध्ये दीड हजार उमेदवारांपैकी १ हजार १७० उमेदवारांनी हजेरी लावली. त्यामधून मैदानी चाचण्यांमध्ये ९३० उमेदवार पात्र ठरले आहेत, अशी माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिली. (प्रतिनिधी)
पन्नास टक्के प्रक्रिया संपलीएकूण सहा दिवसांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. नऊ हजार उमेदवारांना सहा दिवसांमध्ये विभागण्यात आले आहे. सोमवारी तीन दिवस पूर्ण झाले. त्यामुळे साडेचार हजार उमेद्वारांसाठी राबविण्यात आलेली भरती प्रक्रिया संपली आहे. आता मंगळवारपासून तीन दिवस प्रक्रिया राबविण्यात येईल. त्यानंतर पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. तीन दिवसांमध्ये साडे चार हजार उमेदवारांपैकी २ हजार ९८१ उमेदवारांनी भरती प्रक्रियेत सहभाग घेतला. त्यामुळे पहिल्या दिवसानंतर चांगला प्रतिसाद मिळत आहे.