अहमदनगर : ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे सन २०१४-१५ चे किमान आधारभूत किमतीचे (एफआरपी) ३८ कोटी २५ लाख रुपयांचे देणे थकविल्यामुळे सरकारच्या आदेशानुसार माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या साईकृपा युनिट २ (हिरडगाव) या कारखान्याला श्रीगोंद्याच्या तहसीलदार वंदना खरमाळे यांनी मालमत्ता जप्तीची नोटीस बजावली आहे. पाचपुते यांचा साईकृपा साखर कारखाना (हिरडगाव) आर्थिक अडचणीत आहे. कारखाना व्यवस्थापन शेतकऱ्यांना एफआरपीनुसार रक्कम देण्यास असमर्थ ठरला आहे. शेतकऱ्यांच्या थकबाकी संदर्भात सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे कारखान्याची सुनावणी सुरू होती. कारखान्याची मालमत्ता जप्त करण्यासाठी साखर आयुक्तांनी ‘आरआरसी’ (रेव्हेन्यू रिकव्हरी सर्टिफिकेट) प्रमाणपत्र जारी केले होते. या प्रमाणपत्रामुळे जिल्हाधिकारी कारखान्याची मालमत्ता विक्रीस काढून शेतकऱ्यांचे देणे देऊ शकतात. आरआरसी करण्याच्या निर्णयास सहकारमंत्र्यांनी स्थगिती दिली होती. मात्र, कारखान्याचे अपील फेटाळून मालमत्ता विक्रीस आता सरकारने परवानगी दिली आहे. त्यानुसार श्रीगोंद्याच्या तहसीलदार खरमाळे यांनी साईकृपा कारखाना व्यवस्थापनास १७९ आणि १८० नोटीस बजावली आहे. पाच नोटिसा बजावल्यानंतर कारखान्याची सर्व मालमत्ता शासन विक्रीस काढू शकेल, असे खरमाळे यांनी सांगितले. पाचपुते सध्या भाजपात असल्याने या कारवाईस सरकारकडून अगोदर स्थगिती देण्यात आली होती. मात्र, कारवाईचे सरकारचेच धोरण असल्याने जप्तीची प्रक्रिया आता सुरु करण्यात आली आहे.प्रशासनाची नोटीस आज मला पहायला मिळेल. शेतकऱ्यांचे देणे बाकी आहे. लवकरात लवकर पैसे देण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे कारवाई होणार नाही. -बबनराव पाचपुते
‘साईकृपा’च्या जप्तीची नोटीस
By admin | Updated: February 27, 2016 23:37 IST