योगेश गुंड , अहमदनगरविविध विद्यालयांमध्ये प्रवेशासाठी तसेच सध्या महाविद्यालय परिसरात दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांची गर्दी होत आहे़ अकरावी प्रवेशासाठी सर्वांची झुंबड सुरूअसली तरी शहरातील जवळपास १० हजार विद्यार्थांचा कल विज्ञान शाखेकडे तर ४ हजार विद्यार्थी वाणिज्य शाखेसाठी उत्सुक आहेत. मात्र कला शाखेकडे उपलब्ध जागेएवढेही अर्ज न आल्याने कला शाखा विद्यार्थ्याविना कासावीस झाली आहे. कॉलेजची कला शाखा बंद पडू नये म्हणून आता शहरातील नामांकित महाविद्यालयातील प्राध्यापकांनी कला शाखेला विद्यार्थी देता का म्हणून शोधमोहीम सुरु केली आहे.अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू असल्याने विद्यार्थ्यांचा ओढा सर्वात जास्त विज्ञान शाखेकडे दिसून येत आहे. यामुळे शहरातील नामांकित कॉलेजमधून विज्ञान शाखेसाठी प्रवेश घेण्यासाठी उपलब्ध जागेपेक्षा सहा पट जास्त अर्ज आले आहेत. यामुळे अनुदानित जागांचा ‘कट आॅफ’ ९२ टक्क्यापर्यंत गेला आहे. नगर शहरातील महाविद्यालयांमध्ये विज्ञान शाखेच्या २००० जागा आहेत तर प्रवेशासाठी तब्बल ९०२० विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. कनिष्ठ विद्यालय धरून ही संख्या १० हजारांपुढे जाते. विज्ञान शाखेखालोखाल वाणिज्य शाखेकडे विद्यार्थी वळले आहेत. शहरात वाणिज्य शाखेच्या १४४० जागा उपलब्ध आहेत़ या शाखेत प्रवेशासाठी ३७३२ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. शहरात सर्वाधिक म्हणजे जवळपास ३ हजारपेक्षा जास्त जागा असलेल्या कला शाखेकडे विद्यार्थ्यांनी अक्षरश: पाठ फिरवली आहे कारण उपलब्ध जागेएवढे अर्जही दाखल न झाल्याने कला शाखेतील प्रवेश क्षमता कशी पूर्ण होणार या काळजीत आता कला शाखेचे प्राध्यापक पडले आहेत. कला शाखेत विद्यार्थ्यांची असणारी अनास्था कॉलेजसाठी चिंतेचा विषय बनली आहे. उपलब्ध जागेएवढे विद्यार्थी मिळाले नाही तर अनुदानित प्राध्यापक अतिरिक्त ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.ज्या कॉलेज मध्ये विज्ञान प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची झुंबड उडाली आहे त्याच नामांकित कॉलेजचे प्राध्यापक शहर व उपनगरात फिरून विद्यार्थ्यांना कला शाखेकडे चला म्हणून विनवण्या करीत आहेत.यासाठी कॉलेजचे प्राध्यापक विद्यार्थ्यांचा सर्व्हे करून कला शाखेकडे मुले आणण्यासाठी धडपड करताना दिसत आहे.
विद्यार्थ्यांची आर्टबाबत अनास्था; ‘विज्ञान’कडेच ओढा
By admin | Updated: July 4, 2016 23:48 IST