अहमदनगर: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर ‘शांत’ झालेली राष्ट्रवादी पुन्हा एकदा आक्रमणाच्या मूडमध्ये आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने थेट कार्यकर्त्यांपर्यंत जाऊन त्यांच्यात ‘चैतन्य’ आणण्याची रणनिती आखली जात आहे. काल मुंबईत शरद पवार यांच्या अध्यक्षतेत झालेल्या बैठकीनंतर यापुढे स्वबळावर की आघाडी, याची चाचपणी घेतली जाणार आहे. नगर जिल्ह्यात विधानसभेचे सत्र संपल्यावर तालुकावार बैठका होतील. दरम्यान, जिल्ह्यातही अधिक जागांवर दावा ठोकण्याची तयारी राष्ट्रवादीकडून केली जात आहे.लोकसभा निवडणुकीनंतर आघाडी कमालीची धास्तावली आहे. राष्ट्रवादीने मात्र हे आव्हान भेदण्यासाठी तयारी सुरु केली आहे. काल मुंबईत बैठक झाली. या बैठकीत आगामी निवडणुकीत काय रणनिती असावी, यावर चर्चा झाली. स्वबळ की आघाडी हा प्रश्नही समोर आला. त्याप्रमाणे कार्यकर्त्यांना योग्य दिशा द्यावी लागेल, यावरही मंथन झाले. नगर जिल्ह्यातही पक्ष पुन्हा लक्ष केंद्रीत करणार आहे. त्यासाठी आगामी निवडणुकीची चाचपणी म्हणून जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य, पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्ते यांच्याशी थेट संवाद साधला जाणार आहे. तालुकावार बैठका घेवून पक्षश्रेष्ठींना अहवाल दिला जाणार आहे, ‘लोकमत’शी बोलताना पक्ष निरीक्षक अंकुश काकडे याबाबत म्हणाले, सध्या विधानसभेचे सत्र सुरु आहे. पालकमंत्री मधुकरराव पिचड व्यस्त आहेत. सत्र संपताच तालुकावार बैठका होतील. त्यात आगामी निवडणुकीसाठीच्या पर्यायांवर चर्चा होईल. दोन-तीन पर्याय समोर आहेत. समजा उद्या आघाडी टिकली नाही, तर ऐनवेळी गडबड नको म्हणून तयारीचा एक भाग म्हणून याकडे बघत आहोत. मतदारसंघातील परिस्थितीचा अभ्यासही यानिमित्ताने होईल. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष घनश्याम शेलार यांनीही कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा चैतन्य आणण्याकडे लक्ष वेधले. ‘लोकमत’शी बोलताना ते म्हणाले, एकूच राज्यातील स्थितीचा अभ्यास केला जात आहे. पक्षश्रेष्ठी शरद पवार यांनी लोकसभेत ज्याच्या जागा जास्त त्याला विधानसभेत अधिक जागा, या काँग्रेसच्याच फॉर्म्यूल्याकडे लक्ष वेधले आहे. त्यामुळे विधानसभेसाठी जिल्ह्यात अधिक मतदारसंघ कोणते घ्यावेत, याबाबतही चाचपणी केली जाणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर एकीकडे काँग्रेस कोमात अडकलेली असताना राष्ट्रवादी जास्त जागांवर दावा ठोकून आक्रमक राजकारणाची आखणी करीत असल्याचे स्पष्ट होत आहे. (प्रतिनिधी)तयारीत कार्यकर्ता महत्वाचा!आगामी निवडणुकांना सामोरे जाण्यापूर्वी पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा एकदा उत्साह आणावा लागणार आहे. त्यासाठी त्यांच्याशी संवाद महत्वाचा ठरेल. पक्षश्रेष्ठींनी चाचपणीच्या सूचना दिलेल्या आहेत. लोकसभेत ज्याच्या जागा जास्त त्यांना विधानसभेत अधिक जागा, हा फॉर्म्यूला पडताळून पाहिला जाणार आहे. मुंबईतील बैठकीतही हा विषय चर्चेत राहिला. त्यातून कार्यकर्त्यांना संधी मिळेल. पक्षासाठी ते महत्त्वाचे ठरेल. -शंकरराव गडाख, आमदार.
राष्ट्रवादीचा आक्रमक मूड!
By admin | Updated: June 8, 2014 00:34 IST