जामखेड : शहराचे ग्रामदैवत श्री नागेश्वराची यात्रा मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत पार पडली. परंपरेप्रमाणे पालखी सोहळाही पार पडला. यानिमित्त होणारे इतर कार्यक्रम यंदा कोरोनामुळे रद्द करण्यात आले होते.
नागपंचमीनिमित्त येथील नागेश्वराची यात्रा दरवर्षी भरते. शुक्रवारी सकाळी नऊनंतर उत्सवाची सुरुवात होते. मात्र उत्सवाला गर्दी होऊ नये यासाठी मंडळाने अचानक वेळ बदलली. सकाळी ७ ते ९ या वेळेत पूर्ण कार्यक्रम आटोपून घेतले. सकाळी पत्रकार मिठ्ठूलाल नवलखा, त्यांच्या पत्नी मनीषा नवलखा यांच्या हस्ते विधिवत पूजा, आरती करून नागेश्वराचा मुखवटा पालखीमध्ये ठेवण्यात आला. दरवर्षी शहरात जाणारी मिरवणूक यंदा मंदिराच्या प्रवेशद्वारापासूनच परतली. नंतर आरती करून उत्सवाची सांगता झाली.
भजनी मंडळात संत वामनभाऊ महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यापक दादासाहेब महाराज सातपुते, सीताराम राळेभात, हरिदास गुंड, दिलीपकुमार राजगुरू, संतोष बारगजे, सुरेश कुलथे, चोपदार मनोहर राजगुरू सहभागी झाले होते. भक्ती गुंदेचा व आरती बांदल यांनी परिसरात सुंदर रांगोळी काढली. सोहळा यशस्वीतेसाठी श्री नागेश्वर सेवा मंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब खराडे, मिलिंद ब्रह्मे, अण्णा भोसले, बाळासाहेब आरेकर, महादेव घोरपडे, प्रवीण राऊत, शंकर राऊत, महादेव पानसांडे, बबलू टेकाळे, अमोल निमोणकर, गणेश माने, रोणीत खुपसे, बबलू राऊत, रविराज क्षीरसागर, आकाश टेकाळे, कैलास घुगे, ओम बारगजे यांनी परिश्रम घेतले.