आॅनलाइन लोकमतश्रीगोंदा (अहमदनगर), दि़ 29 - कुकडीचे आवर्तन फळबागांना देण्यात यावे, यामागणीसाठी आमदार राहुल जगताप यांनी कुकडी कालव्यात हरिनामाच्या गजरात सुरू केलेले आंदोलन चौथ्या दिवसीही सुरुच राहिले़ शनिवारी आंदोलकांनी कालव्यातच हरिनामाचा गजर करीत भोजनाचा आस्वाद घेतला़ शनिवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास कुकडीचे कार्यकारी अभियंता सुभाष कोळी, प्रांताधिकारी गोविंद दानेज, पोलीस उपअधीक्षक सुदर्शन मुंडे, तहसीलदार महेंद्र महाजन यांनी आमदार राहुल जगताप, राजेंद्र नागवडे, अण्णासाहेब शेलार, बाळासाहेब नाहाटा यांच्याशी चर्चा करीत आंदोलन थांबविण्याची विनंती केली़ त्यावर आमदार जगताप म्हणाले, पालकमंत्री राम शिंदे यांनी शुक्रवारी श्रीगोंद्यात फळबागांना पाणी देण्याची घोषणा केली आहे़ मग कोळी साहेब तुम्ही पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन द्या़ आम्ही आंदोलन मागे घेतो़मात्र, कार्यकारी अभियंता कोळी यांनी लेखी देता येणार नाही असे सांगितले़ त्यामुळे आंदोलन सुरुच ठेवण्याचा निर्धार जगताप यांनी व्यक्त केला़ त्यानंतर अधिकाऱ्यांची टीम कुकडीचे वाढीव पाणी मिळण्यासंदर्भात जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करण्यासाठी नगरला रवाना झाली़ ५०० एम़सी़एफ़टी़ पाणी वाढून देण्याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे़
कुकडी कालव्यातच आंदोलकांच्या पंगती; पाण्यासाठी ठिय्या
By admin | Updated: April 29, 2017 14:06 IST