नेवासा : गेल्या सात वर्षात मोदी सरकारच्या जनविरोधी धोरणामुळे देशातील जनता देशोधडीला लागली आहे, अशी टीका अखिल भारतीय किसान सभेचे ॲड. बन्सी सातपुते यांनी केली.
शेतकरी विरोधी कायदे मागे घ्या या मागणीचे फलक घेऊन बन्सी सातपुते व भारतीय महिला फेडरेशनच्या स्मिता पानसरे-सातपुते यांनी घरावर काळे झेंडे लावून केंद्र सरकारचा नेवासा येथे निषेध नोंदवला.
२६ मे रोजी केंद्र सरकारला सात वर्षे पूर्ण झाली. ठिकरी येथील ऐतिहासिक शेतकरी आंदोलनाला सहा महिने तसेच कामगार संपाला सहा महिने पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने देशभर बुधवारी निषेध दिवस पाळला गेला. कार्यकर्त्यांनी घरावर काळे झेंडे लावले.
यावेळी सातपुते म्हणाले, मोदी सरकारने शेतकरी विरोधी तीन कृषी कायदे आणून त्यांना गुलाम बनविण्याचे षड्यंत्र आखले आहे. शेती भांडवलदारांच्या घशात घालण्याचा कुटील डाव खेळला जात आहे. २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन मोदी सरकारने दिले होते. मात्र उत्पन्न दुप्पट होण्याच्या ऐवजी उत्पादन खर्च दुप्पट होऊन उत्पन्न मात्र निम्मे झाले आहे. खताचे दर वाढवून शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनाला हरताळ फासला आहे. लसीकरणामध्ये मोठी अनागोंदी सुरू आहे, अशी टीका त्यांनी केली.