यशवंतराव चव्हाण सभागृहात नगराध्यक्षा अनुराधा आदिक, उपनगराध्यक्ष करण ससाणे, मुख्याधिकारी गणेश शिंदे यांच्या उपस्थितीत अर्थसंकल्प सादर करण्यात आला. मागील वर्षापेक्षा त्यात ५० कोटी रुपयांची वाढ झाली आहे. मात्र, अर्थसंकल्पातील आकडे फुगविले असल्याचे यावेळी झालेल्या चर्चेतून स्पष्ट झाले.
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मिल्लतनगर येथील साठवण तलावाच्या दुरुस्तीकरिता मुन्फ्रा या सरकारी संस्थेकडून पालिकेने चार वर्षांपूर्वी ५ कोटी रुपये कर्ज घेतले होते. मात्र, तलावाच्या कामाकरिता त्यापेक्षा अधिक खर्च अपेक्षित असल्याने हे पैसे तसेच पडून राहिले. या कर्जावर पालिकेला दरवर्षी २५ लाख रुपयांहून अधिक व्याज भरावे लागत आहे. पालिकेला दिल्या जाणाऱ्या चौदाव्या वित्त आयोगाच्या रकमेतून सरकार या पैशांची परस्पर कपात करत आहे. या सर्व व्यवहारांचा तपशील ताळेबंदात स्पष्टपणे सादर करण्यात आला नाही. त्यातील सव्वातीन कोटी रुपयांचा हिशेबच जुळला नाही. त्यामुळे विरोधक उपनगराध्यक्ष ससाणे, श्रीनिवास बिहाणी, दिलीप नागरे, मुजफ्फर शेख, भारती कांबळे, शामलिंग शिंदे यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. स्वत: नगराध्यक्षा आदिक यांनीही यावर नाराजी व्यक्त केली.
यावर विरोधकांनी हा अर्थसंकल्प कोणी तयार केला, असा संतप्त सवाल उपस्थित केला. अधिकारी सभागृहाची दिशाभूल करत आहेत. मुख्याधिकाऱ्यांनीही अर्थसंकल्पाचा अभ्यास केलेला नाही, असा टोला त्यांनी लगावला. त्यामुळे अधिकाऱ्यांची भंबेरी उडाली. काही नगरसेवकांनी नाराजी व्यक्त करत सभेतून काढता पाय घेतला.
-----------
‘जंगल’ मालमत्ता
अर्थसंकल्पाच्या ताळेबंदात लेखाशीर्षमध्ये ‘जंगम’ मालमत्तेऐवजी ‘जंगल’ मालमत्ता हा शब्दप्रयोग करण्यात आला आहे. मागील अर्थसंकल्पातील चूक यावेळीही गिरवण्यात आली. त्यामुळे अधिकाऱ्यांचा कारभार चव्हाट्यावर आला.
------------
अर्थसंकल्पाची प्रत दिली नाही
नगरसेवकांना दुरुस्ती केलेल्या अर्थसंकल्पाची प्रत देण्यात आली नाही. त्यामुळे सभा सुरू होताच नगरसेवकांनी त्यावर टीकेची झोड उठवली.
-----------