अहमदनगर : मास्क वापरला नाही, अशा दहा हजार व्यक्तींवर जिल्हा प्रशासनाने कारवाई केली आहे. अशांकडून तब्बल ११ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संदी निचित यांनी दिली. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने केलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी जिल्ह्यात करण्यात येत आहे. फेब्रुवारी महिन्यापासून रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन प्रशासनाने नियम न पाळणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई सुरू केली. २० फेब्रुवारी ते ३ मार्चपर्यंत मास्क न वापरणाऱ्या १० हजारांहून अधिक जणांवर दंडात्मक कारवाई केली. यामध्ये ११ लाख ३६ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. २० फेब्रुवारी ते ३ मार्च, २०२१ या कालावधीत लग्न समारंभ, हॉटेल, रेस्टॉरंट, सिनेमा हॉल, धार्मिक स्थळे आणि इतर सार्वजनिक ठिकाणे अशा ९५७ ठिकाणी तपासणी करण्यात आली. त्यापैकी १९१ ठिकाणांवर दंडात्मक कारवाई करून २ लाख ४ हजार ९०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
मास्क वापरला नाही, नगर जिल्ह्यात ११ लाखांचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:21 IST