अहमदनगर : भगवानगडावर यावर्षी दसऱ्याला कोणालाही भाषण करता येणार नाही, या भूमिकेवर गडाचे महंत नामदेवशास्त्री ठाम आहेत. रविवारी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांनी गडाला भेट देऊन कायदा-सुव्यवस्थेचा आढावा घेतला. महंतांशी प्रशासनाने बंद खोलीत चर्चाही केली. गडावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यास सुरवात झाली आहे. ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे दसऱ्याला भगवानगडावर जाणार असल्याचा शासकीय दौराच जाहीर झाला आहे. भगवानगडाशेजारील खरवंडी गावात हेलिपॅडही तयार करण्यात आले आहे. मात्र, गडावर दसरा मेळाव्यात मुंडे यांचे भाषण होणार, की नाही याबाबत साशंकता कायम आहे. जिल्हाधिकारी अनिल कवडे व पोलीस अधीक्षक सौरभ त्रिपाठी यांनी रविवारी सायंकाळी भगवानगडाला भेट देऊन कायदा-सुव्यवस्थेचा आढावा घेतला. गडावर मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. शीघ्र कृतिदलाच्या तुकड्या आज गडावर पोहोचल्या. अधिकाऱ्यांनी महंत नामदेवशास्त्री यांच्यासोबत सुमारे अर्धा तास बंद खोलीत चर्चा केली. या चर्चेचा तपशील समजू शकलेला नाही. कायदा-सुव्यवस्थेबाबत ही चर्चा झाली असून, गडावर कोणालाही भाषण करता येणार नाही, ही बाब आपण प्रशासनाला सांगितली असल्याचे महंतांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. दसरा मेळाव्यासाठी गडावर दर वर्षी व्यासपीठ उभारले जाते. यावर्षी मात्र अद्याप हे व्यासपीठ उभारण्यात आलेले नाही. व्यासपीठ उभारले जाणार नाही. दसऱ्याला सर्वांना फक्त दर्शनासाठीच येथे येता येईल, असे महंत म्हणाले. मुंडेसमर्थकांनी ‘चलो भगवानगड’ असा नारा देत या परिसरातील गावागावांत मेळाव्याचे फलक लावले आहेत. दसरा मेळाव्याला गडावर जमायचे, असा संदेश मुंडेसमर्थकांना दिला गेला आहे. प्रशासन सोमवारी निर्णय घेणार भगवानगडाच्या वादावर काय तोडगा काढायचा, याबाबतचा प्रशासकीय निर्णय सोमवारी जाहीर केला जाणार आहे. स्थानिक प्रांताधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना मार्गदर्शन मागितले आहे. रविवारी जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: पाहणी केली. मात्र, प्रशासनाने अधिकृतपणे काहीही जाहीर केलेले नाही. मेळाव्याच्या परवानगीबाबत निर्णय झालेला नसल्याचे प्रांताधिकारी प्रशांत खेडेकर यांनी सांगितले.