लोकमत न्यूज नेटवर्क
शेवगाव : शेवगाव-पाथर्डी शहरासह ५४ गावांसाठी वरदान ठरलेल्या व सध्या कालबाह्य झालेल्या प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेवर बोगस नळ कनेक्शनचा अतिरिक्त भार आहे. शेवगाव शहरात १८ हजार घरे (उंबरे) असून नळ कनेक्शन अवघी सात हजार आहेत. याकडे नगरपालिकेचे दुर्लक्ष होत असल्याने नियमित पाणीपट्टी भरणारांना विनाकारण पाणी टंचाईला सामोरे जावे लागते.
शेवगाव शहराचा विस्तार झपाट्याने सुरू आहे. मात्र, त्यातुलनेत विस्तारलेल्या भागातील नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात पालिका प्रशासन, पदाधिकारी असमर्थ ठरत आहेत. आगामी काळात पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर होण्याची शक्यता आहे. २०११ च्या जनगणनेनुसार शहराची ३८ हजार ३७५ लोकसंख्या आहे. प्रत्यक्षात गत दहा वर्षांत लोकसंख्येने ५० हजारांचा आकडा ओलांडला आहे. वाढलेली लोकसंख्या, त्या तुलनेत अपुरी पाणी साठवण क्षमता, गल्लीबोळातील कालबाह्य झालेल्या जलवाहिन्या, पाण्याचा दाब नियंत्रित करण्यासाठी शहरात बसविण्यात आलेले ३१० व्हॉल्व्ह, २ हजारहून अधिक अनधिकृत नळ कनेक्शन, सद्य:परिस्थितीत सुरू असलेला विजेचा लपंडाव यामुळे शहराचा पाणी प्रश्न गंभीर बनला आहे. कालबाह्य झालेल्या जलवाहिनीवरील पाण्याचा दाब नियंत्रित करण्यासाठी शहरात तब्बल ३१० व्हॉल्व्ह बसविण्यात आले आहेत. १८ हजार उंबरे असलेल्या शहरात केवळ ७ हजार नळ कनेक्शन अधिकृत असून काही दिवसांपूर्वी पालिकेने ४०० अनधिकृत नळ कनेक्शन अधिकृत केले आहेत. याबाबत नगरपालिका प्रशासनाचे म्हणणे समजून घेण्यासाठी मुख्याधिकाऱ्यांना दूरध्वनीवरून संपर्क करण्याचा प्रयत्न ‘लोकमत’ प्रतिनिधीने केला. मात्र, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
---
योजनेचे आयुर्मान संपले..
१९९८ साली कार्यान्वित झालेल्या शेवगाव-पाथर्डी ५४ गावे पाणी पुरवठा योजनेचे आयुर्मान १५ वर्षांचे होते. त्या बाबीलाही आता ७ वर्षे उलटली. त्याच योजनेवर लाखो लोकांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न अवलंबून आहे. ही योजना कालबाह्य झाल्याने वारंवार जलवाहिनी फुटण्याचे प्रमाण वाढले आहे.
----
पाणी साठवण्यासाठी टाक्यांची कमतरता
५० हजार लोकसंख्येच्या शहरात केवळ १७.५ लाख लिटर क्षमतेच्या पाणी साठवण टाक्या आहेत. पंचायत समितीसमोर ७.५ लाख लिटर तर तहसील कार्यालयाशेजारी १० लाख लिटर पाणी साठवण क्षमता असलेली टाकी आहे. शहराला सरासरी ५५ ते ६० लाख लिटर प्रतिदिन पाणी आवश्यक आहे. त्यामुळे आणखी टाक्या नव्याने बांधणे गरजेचे आहे.
--
करार करण्यास टाळाटाळ..
पालिकेला जिल्हा परिषदेने योजनेंतर्गत करार करण्यासंदर्भात कळविले आहे. शहरात नळ कनेक्शन किती? नागरिक किती? याची माहिती देऊन पाण्याची आवश्यकता, यासंबंधी करार करण्यास दोन वर्षांपूर्वीच सांगितले आहे. मात्र, पालिका करारही करत नाही अन् पाणीपट्टीपोटी थकलेले ८ कोटीही भरण्यास टाळाटाळ करत आहे.