कोपरगाव : तालुक्यातील पश्चिम भागात रविवारी झालेल्या गारपिटीमुळे शेकडो हेक्टर शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले होते. सोमवारी दुपारनंतर याच परिसरातील रांजणगाव देशमुख मधील सहाने वस्ती व अंजनापूर भागात गारपीट झाल्याने शेकडो हेक्टर शेतातील पिकांचे तसेच फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे.
या नुकसानीची तहसीलदार योगेश चंद्रे, तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव यांच्यासह शासकीय यंत्रणेतील अधिकाऱ्यांनी सोमवारी प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन पाहणी केली. यावेळी तहसीलदार चंद्रे यांनी झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, तहसीलदार योगेश चंद्रे हे शहापूर परिसरात नुकसानीची पाहणी करीत असताना नुकसानीचे पंचनामे होतात. परंतु नुकसानभरपाईची रक्कम मिळण्यास खूप उशीर होतो, याबद्दल शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.