अहमदनगर : शहरातील अनधिकृत जाहिरात फलकांचा मुद्दा चांगलाच ऐरणीवर आला आहे. महापालिका प्रशासनाने पंतप्रधान नरेंद्र मोदी व खासदार डॉ.सुजय विखे यांचे छायाचित्र असलेल्या जाहिरात फलकांवर कारवाई केल्याने भाजपमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. यामुळे विनापरवाना फलकांवर कारवाई करण्याची मागणी पुढे आली आहे. त्यामुळे महापालिका आता विनापरवाना फलकांवर कारवाई करणार का, असा प्रश्न या निमत्ताने उपस्थित झाला आहे.
शहरासह उपनगरांत राजकीय पक्षांचे मोठेमोठे फलक लावण्यात आले आहेत. शहरातून जाणारे महामार्ग जाहिरात फलकांनी झाकोळून गेले आहेत. शहरातील प्रमुख चौकात राजकीय नेत्यांचे वाढदिवस, निवडीबद्दल अभिनंदन, नेत्यांचे स्वागत, यांसह अनेक अनधिकृत फलक लावण्यात आले आहेत. महापालिकेने लॉकडाऊननंतर प्रथमच अतिक्रमणांवर कारवाई सुरू केली आहे. ही कारवाई सुरू असतानाच, मंगळवारी पालिकेने भाजपचे चार ठिकाणचे फलक हटविले. ही कारवाई भाजपाच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे. भाजपने रितसर परवानगीसाठी पालिकेत अर्जही केला आहे. महापालिकेतून पायउतार झाल्यानंतर भाजपाला प्रथमच कारवाईला सामोरे जावे लागले. ही कारवाई प्रशासनाने स्वत:हून केली की, कुणाच्या सांगण्यावरून, याबाबत साशंकता आहे.
महापालिकेत महाविकास आघाडीची सत्ता आहे. सत्ताधारी महाविकास आघाडीच्या नेत्यांचे अनेक फलक शहरात लावलेले आहेत. हे फलक लावताना महापालिकेची परवानगी घेतली गेली नाही. या फलकांवर पालिकेने कारवाई केली नाही. यापूर्वीही पालिकेकडून फलकांवर कुठलीही कारवाई झाली नाही, परंतु अचानक भाजपाच्या फलकांवर कारवाई झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. पालिकेने ही कारवाई सुरू ठेवली नाही. पालिकेने फलकांवरील कारवाईची मोहीम गुंडाळली, हे विशेष
.....
पालिकेला भाजपचेच फलक दिसले का?
महापालिकेने भाजपने लावलेल्या फलकांवर कारवाई केली. परवानगीसाठी अर्ज देण्यात आलेला आहे. जाहिरात फलकांसाठी पालिकेची रितसर परवानगी घेतली जाईल, परंतु शहरात ते विनापरवाना फलक आहेत. त्यांच्यावर पालिका कारवाई करणार का, शहरात किती अनाधिकृत फलक आहेत, याची माहिती घेणार असून, कारवाईची मागणी केली जाणार असल्याचे भाजपचे शहरजिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे यांनी याबाबत बोलताना सांगितले.
....