अहमदनगर: नगर शहरात शहर बससेवा चालविणाऱ्या प्रसन्ना पर्पल अभिकर्ता संस्थेला दरमहा ७ लाख रुपये भरपाई हवी आहे. तसेच २३ पैंकी ८ बसेस अन्यत्र हालविण्याची परवानगीही हवी आहे. अभिकर्ता संस्थेची ही मागणी मनपा प्रशासनाला मात्र अवास्तव वाटत आहे. त्यामुळे यावर निर्णय घेण्यासाठी सोमवारी (दि.१६) स्थायी समितीची तातडीची बैठक होत आहे. प्रसन्ना पर्पल अभिकर्ता संस्था नगर शहरात बससेवा चालवित आहे. संस्थेला तोटा होत असल्याने महापालिकेने संस्थेला दरमहा २ लाख ९६ हजार रुपये भरपाई देण्यास सुरूवात केली. शिवाय अभिकर्ता सांगेल त्याप्रमाणे महापालिका शासनाकडे पत्रव्यवहार करत आहे. शहरातील प्रवासी सोईकरिता महापालिकेने बससेवा सुरू ठेवली आहे. ती सुरू रहावी यासाठी सर्वस्तरावर प्रयत्न केले आहे. तिकीट दरवाढ, थांबे असेल किंवा करमाफी असेल त्यासाठी जिल्हाधिकारी, पोलीस, विभागीय आयुक्त व शासनाला महापालिकेनेच पत्रव्यवहार केलेला आहे. अभिकर्ता संस्थेचा तोटा भरपाई म्हणून महापालिका संस्थेला दरमहा २ लाख ९६ हजार रुपये देत आहे. संस्थेला मात्र ही भरपाई ७ लाख रुपये हवी आहे. शहर बससेवा सुरू ठेवावी हे महापालिकेवर बंधनकारक नाही. करारानुसार संस्थेने शहरात विविध मार्गावर ३० बसेस सुरू करणे बंधनकारक होते. परंतु आजपर्यंत त्याची पूर्तता संस्थेने केली नाही. केवळ २३ बसेसवर भागविले जात आहे. २३ पैकी आजमितीला केवळ १२ बसेस शहरात धावत असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. नवीन मार्गावर बसेस सुरू कराव्यात असे पत्र महापालिका पदाधिकाऱ्यांनी दिलेले आहे. अभिकर्ता संस्थेची मागणी अवास्तव असून बसेस अन्यत्र हालविण्यास परवानगी दिली तर तो करारभंग ठरेल असे प्रशासनाचे मत आहे. (प्रतिनिधी)सोमवारी बैठक शहर बससेवा चालविणाऱ्या अभिकर्ता संस्थेची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. ती वास्तव कि अवास्तव याचा निर्णय प्रशासन व पदाधिकारी घेतील. संस्थेची मागणी अवास्तव असल्याचे मत प्रशासनाने नोंदविले आहे. त्यावर निर्णय घेण्यासाठी सभापती किशोर डागवाले यांनी स्थायी समितीची सभा १६ जून रोजी बोलविली आहे.
अभिकर्ता संस्थेला हवी भरपाईत वाढ
By admin | Updated: June 16, 2014 00:09 IST