अहमदनगर : जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या निवडणुकीसाठी सोमवार (दि. १) पासून माघारीची मुदत सुरू होत आहे. बँकेच्या २१ संचालकपदाच्या जागांसाठी ६७५ इच्छुकांचे अर्ज शिल्लक असून कोणत्याच मंडळाने अद्याप युती-आघाडीची घोषणा केलेली नाही. युती-आघाडी झाल्यास जागा वाटपाचा प्रश्न निर्माण होणार असून यात बंडखोरीचा धोका असल्याने सर्व मंडळाच्या नेत्यांकडून सावध भूमिका घेण्यात येत आहे.जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या संचालकपदासाठी येत्या २८ तारखेला मतदान होणार आहे. १ ते १५ तारखेदरम्यान माघारीसाठी मुदत देण्यात आलेली आहे. या काळात इच्छुकांच्या उमेदवारी अर्जांची माघार घेताना नेत्यांची डोकेदुखी वाढणार आहे. या निवडणुकीत गुरुमाउली, गुरुकुल, सदिच्छा, इब्टा, गुरुसेवा, ऐक्य मंडळ लढणार आहेत. या सर्व मंडळांच्या इच्छुकांनी निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. सर्वाधिक २०० हून अधिक इच्छुकांचे अर्ज गुरुकुल आणि गुरुमाउली मंडळांकडून दाखल करण्यात आलेले आहेत. सदिच्छा मंडळाने जवळपास दीडशे अर्ज दाखल केलेले आहेत. ऐक्य मंडळाने ६०, इब्टाने ५० च्या जवळपास, गुरुसेवा मंडळाने ३० च्या जवळपास उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत. आता यापैकी ज्या मंडळाची युती अथवा आघाडी होईल, त्यांच्यात जागा वाटप कसे होणार, इच्छुकांची समजूत कशी काढणार, असा प्रश्न आहे. यातून नाराजांची संख्या वाढणार असून याचा फायदा प्रतिस्पर्धी मंडळाला होणार आहे. (प्रतिनिधी)
युती-आघाडी झाल्यास बंडखोरीचा धोका
By admin | Updated: January 31, 2016 23:31 IST