अहमदनगर : शासनाने दारिद्र्यरेषेखालील नागरिकांसाठी काही निकष ठरवून दिले आहेत. जिल्ह्यातील काही नागरिक शासकीय निकषांना फाटा देत सुविधा प्राप्त करून घेत आहेत. असाच प्रकार रेशन उचलण्यामध्येही होत असून, घरात टीव्ही, फ्रीज, दुचाकी आणि चारचाकी वाहन असतानाही अनेक जण रेशन दुकानातून धान्य उचलत आहेत.
सद्य:स्थितीत पुरवठा विभागाकडील आकडेवारीनुसार ८८ हजार ३५८ नागरिक दारिद्र्यरेषेखाली आहेत. दारिद्र्यरेषेखालील नागरिकांना त्रास होऊ नये, इतर नागरिकांच्या तुलनेमध्ये त्यांनाही सुविधा प्राप्त व्हाव्यात, यासाठी शासनाने काही निकष ठरवून दिले आहेत. त्यानुसार त्यांना धान्य, तसेच इतर सुविधा प्राप्त करून दिल्या जातात. मात्र, याकडेही काही श्रीमंतांची नजर असून, त्यांच्या वाट्यातील लाभ हेच लोक घेत आहेत. त्यामुळे दारिद्र्यरेषेखालील नागरिक वंचित राहत आहेत.
----
जिल्ह्यातील लोकसंख्या- ४५,४३,०८०
एकूण रेशनकार्डधारक- १०, ८८, ३८५
दारिद्र्यरेषेखालील कार्डधारक- ८८३५८
-----
कोणत्या तालुक्यात किती दारिद्र्यरेषेखालील कार्डधारक
अकोले-६३४८
संगमनेर-६२७८
कोपरगाव-६८६६
राहाता-५७३४
श्रीरामपूर-५७४५
नेवासा-७२३४
शेवगाव-९६८७
पाथर्डी-६२१६
नगर- ६४०९
राहुरी -६०८१
पारनेर -३७९७
श्रीगोंदा-८८४७
कर्जत - ३५२१
जामखेड-५५९५
एकूण-८८३५८
-----
दारिद्र्यरेषेसाठीचे निकष काय?
कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न १५ हजार रुपयांपेक्षा कमी आहे. अशांचा दारिद्र्यरेषेखालील लाभार्थी म्हणून उल्लेख केला जातो.
कुटुंबातील कोणतीही व्यक्ती व्यवसाय कर, विक्रीकर किंवा आयकर भरत नसावी किंवा भरण्यास पात्र नसावी.
कुटुंबाकडे निवासी दूरध्वनी नसावा, कुटुंबाकडे चारचाकी वाहन नसावे, दोन हेक्टर जिरायत जमीन नसावी.
-------
यादीत गोंधळ कारण......
१) जेव्हा-जेव्हा तपासणी कार्यक्रम आखला जातो, तेव्हा कधी शासकीय, तर कधी स्थानिक कारणांमुळे अडथळा येतो. त्यामुळे या कार्डची प्रत्यक्षरीत्या शहानिशा होत नाही. परिणामी निकषात बसत नसतानाही अनेकांना लाभ मिळत आहे.
२) दारिद्र्यरेषेखालील लोकांचा आढावाच घेतला गेला नाही
जिल्ह्यात १५ टक्के नागरिक दारिद्र्यरेषेखालील असल्याचे अंत्योदय व प्राधान्य कार्डवरून दिसून येते. मात्र, अनेकांकडे निकष सोडून टीव्ही, फ्रीज एवढेच काय तर चारचाकी वाहनेसुद्धा आहेत. त्यामुळे खऱ्या अर्थाने दारिद्र्यरेषेखालील लोकांना लाभ न मिळता दुसरेच लाभ घेत आहेत.
----
जिल्ह्यात ६ लाख ९४ हजार
लोकांना मोफत रेशन
जिल्ह्यात ८८ हजार ६१८ नागरिकांना अंत्योदय योजनेअंतर्गत धान्य दिले जाते. प्राधान्य गटातील ६ लाख ५ हजार ५२४ लाभार्थ्यांना धान्य दिले जाते. अंत्योदय आणि प्राधान्य गटातील प्रत्येकजण धान्य उचल करीत आहे. दारिद्र्यरेषेखालील काही नागरिकांचा अंत्योदय तर काही नागरिकांचा प्राधान्य कुटुंबात समावेश झाला आहे.
- जयश्री माळी, जिल्हा पुरवठा अधिकारी