संगमनेर : मराठ्यांचा इतिहास हा त्यांच्या थोर पराक्रमाचा असून तो जाणीवपूर्वक समजावून घेतला पाहिजे, असे प्रतिपादन साहित्यिक विश्वास पाटील यांनी केले. कवी अनंत फंदी व्याख्यानमालेचा रविवारी पाटील यांच्या हस्ते प्रारंभ झाला. ‘मी आणि माझे लेखन’ या विषयावर त्यांनी पहिले पुष्प गुंफले. अध्यक्षस्थानी आ. डॉ. सुधीर तांबे होते. व्यासपीठावर प्रकाश बर्डे, प्रा. ओंकार बिहाणी, डॉ. संतोष खेडलेकर, अनिल राठी आदी उपस्थित होते. पाटील म्हणाले, ऐतिहासिक कादंबऱ्या लिहिण्याचा स्वभाव नव्हता. परंतु मराठ्यांचा इतिहास जगासमोर यावा, या उद्देशाने ‘पानिपत’ कादंबरी लिहिली. माझ्या साहित्यात गणगोतातील जवळच्या व्यक्तीरेखा सापडल्या. ‘झाडाझडती’च्या रुपाने गावच्या लोकजीवनाचे वास्तव चित्रण करण्याचा प्रयत्न केला. गावाकडच्या मातीत स्वत:चे बाळंतपण स्वत:च करून दगडाने नाळ तोडणारी स्री पाहिली. मराठी भाषा ही उत्तम असून व्यक्तीरेखेप्रमाणे ती बदलल्यास साहित्य दर्जेदार बनते. ऐतिहासिक कादंबऱ्या लिहिताना खूप काळजी घ्यावी लागते. केसभराच्या चुकीला देखील त्यात माफी नसते. गिरणी कामगारांचे वास्तव ‘लस्ट फॉर लालबाग’ मधून लिहिले. सुभाषचंद्र बोस यांच्या वास्तववादी जीवनावरील ‘महानायक’ कादंबरीची निर्मिती झाली. संभाजीराजांचा खरा इतिहास समोर आणण्यासाठी ‘संभाजी’ कादंबरी लिहिली. साहित्यिकाने सत्य मांडताना कटू प्रसंगांना तोंड द्यावे लागते. मात्र त्याचा विचार करू नये. प्रशासकीय अधिकारी असल्याने येणाऱ्या लोकांच्या तक्रारीतील भाषेचा साहित्यात उपयोग करता आला, असे सांगत पाटील यांनी आपल्या साहित्य प्रवासाचे वर्णन केले. व्याख्यानास रसिक प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)
मराठ्यांचा इतिहास पराक्रमाचा
By admin | Updated: December 24, 2015 23:38 IST