ग्रामीण भागात प्रत्येक गावात किराणा दुकान, पानटपरी इत्यादी ठिकाणी गुटख्याच्या पुड्या विक्री होताना आढळून येत आहे. कोणाचीही भीती न बाळगता गुटख्याची खुलेआम विक्री सुरू आहे. होलसेल गुटखा विक्रेते हे सर्व खेड्यात व गावात प्रत्येक दुकानावर गुटख्याचा माल दुचाकीवरून पोहोचून देण्याचे काम करीत असल्याचे चित्र आहे. मात्र त्यांच्यावर कोणतीच कारवाई होताना दिसून येत नसल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
महिला, पुरुष व शालेय विद्यार्थीसुद्धा मोठ्या प्रमाणात या गुटख्याच्या आहारी गेले आहे. कर्करोगाचा वाढता धोका लक्षात घेता महाराष्ट्र शासनाने धाडसी निर्णय घेत राज्यात गुटखा बंदीचा निर्णय घेतला होता. कठोर अंमलबजावणीसाठी कायदा सुद्धा निर्माण केला आहे. परंतु अन्न व औषध प्रशासन विभाग आणि पोलीस प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याचे दिसत आहे. दुर्लक्षामुळे गुटखा विक्री सर्रास सुरू आहे.