अहमदनगर: माझ्या मुलाची क्रूरपणे हत्या झाल्यानंतरही प्रशासन आपणाला सहकार्य करायला तयार नाही. मुलाच्या मृत्युचा शवविच्छेदन अहवाल व साधा पंचनामाही मला पोलिसांकडून मिळालेला नाही. या व्यवस्थेत आपणाला न्यायच मिळणार नसेल तर मी स्वत: आत्महत्या करेल किंवा मलाच न्याय करावा लागेल, असा संतप्त इशारा खर्डा येथील मयत नितीन आगेचे वडील राजू आगे यांनी दिला आहे. राज्यव्यापी जातीय अत्याचार विरोधी धिक्कार परिषदेत नितीन आगेचे वडीलही सहभागी झाले होते. त्यावेळी भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर, कॉ. गोविंद पानसरे यांच्यासमोर आगे यांनी आपल्या भावना मांडल्या. नितीनच्या हत्येनंतर सर्व राज्य हादरले. मोठमोठ्या लोकांनी खर्ड्यात भेटी दिल्या. मात्र प्रशासन आपणाला सहकार्य करायला तयार नाही, अशी खंत त्यांनी मांडली. आगे यांच्या या म्हणण्याची आंबेडकर यांनी गंभीर दखल घेतली. ते म्हणाले, ज्या कुटुंबावर एवढा मोठा सामाजिक अन्याय झाला आहे त्या कुटुंबाची ही भावना सरकारने जाणून घेणे आवश्यक आहे. आगे यांना जो अनुभव येत आहे तो दुर्दैवी आहे. परंतु त्यांनी खचून जाऊन आत्महत्येची भाषा करणेही योग्य नाही. या व्यवस्थेत संघर्ष करावा लागेल. रडगाणे थांबवून अत्याचार करणाऱ्यांवर आता वार करायला शिकावे लागेल, असे ते म्हणाले.मुख्यमंत्री निधीची मदत अद्याप नाही नितीन आगेच्या हत्येनंतर अनेक मंत्र्यांनी खर्डा येथे आगे कुटुंबीयांना भेट दिली. त्यावेळी मुख्यमंत्री निधीतून पाच लाखाची मदत जाहीर करण्यात आली. परंतु ती अद्यापही या कुटुंबाला मिळालेली नाही. या कुटुंबाला घरकूल देण्याचे तसेच शेतीसह पुनर्वसन करण्याचे आश्वासन देण्यात आले. मात्र याबाबतही काहीच झालेले नाही. राजकीय पक्षांपैकी काँग्रेस व राष्ट्रवादीने जाहीर केल्याप्रमाणे मदत दिली. पण भाजपची मदत अद्याप मिळालेली नाही. भाजपने धनादेश दिला होता.
‘न्याय द्या, अन्यथा आत्महत्या करेल’
By admin | Updated: June 18, 2014 01:22 IST