बाभळेश्वर : हवामानावर आधारित फळपीक योजना मागील वर्षी शेतकऱ्यांना लाभदायक ठरल्याने यंदाच्या वर्षीही फळपीक विमा योजना सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती राज्याचे कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिली़योजनेच्या पहिल्या टप्प्यात संत्री, मोसंबी आणि पेरू या तीन फळपिकांचा योजनेत समावेश असून २० जून २०१४ पर्यंत फळपीक उत्पादकांना या विमा योजनेत सहभागी होता येणार असल्याचे स्पष्ट करून मंत्री विखे म्हणाले की, बदलत्या हवामानाचा फळपिकांवर परिणाम होऊन मोठ्या आर्थिक नुकसानीस सामोरे जावे लागते़ यावर उपाय म्हणून हवामानावर आधारित पीक विमा योजनेची सुरूवात शासनाने केली़ मागील वर्षी पथदर्शी स्वरूपात संत्री, मोसंबी, पेरूसह द्राक्ष, डाळिंब, आंबा, काजू या पिकांना प्रतिकूल हवामानापासून संरक्षण देण्यासाठी पीक विमा योजना लागू करण्यात आली़ राज्यात मागील वर्षी झालेल्या अवकाळी पाऊस, गारपीट या नैसर्गिक संकटात नुकसान झालेल्या फळबागांना या योजनेचा मोठा लाभ झाला असे, मंत्री विखे यांनी आवर्जून सांगितले़इतर पिकांप्रमाणेच फळपीक विमा योजनेचाही उत्पादक शेतकऱ्यांना लाभ होतो़ हे निदर्शनास आल्याने फळपीक योजना या वर्षीही सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगून मंत्री विखे म्हणाले की, कमी पाऊस, पावसातील अनियमितता, हवामानातील सापेक्ष आर्द्रता या हवामान घटकांपासून फळबागांना संरक्षण देतानाच फळबागायतदारांना दिलासा देण्यासाठी फळपीक योजनेच्या अंमलबजावणीची कार्यवाही कृषी विभागामार्फत सुरू झाली असल्याचे त्यांनी सांगितले़या वर्षी संत्री, मोसंबी, पेरू व संत्र्यासाठी प्रत्येकी सात जिल्ह्यांचा समावेश या योजनेत करण्यात आला असल्याने फळबाग उत्पादकांना याचा लाभ होईल़ नगर जिल्हा हा फळपीक उत्पादनात आघाडीवर आहे़ त्यामुळे जिल्ह्यातील फळबाग उत्पादकांना या विमा योजनेचा दिलासा देण्याचा प्रयत्न असल्याचे विखे यांनी सांगितले़ (वार्ताहर)
यंदाही सुरू राहणार फळपीक विमा योजना
By admin | Updated: June 10, 2014 00:14 IST