अहमदनगर : वारंवार मागणी करूनही कुकडी प्रकल्पाचे अधिकारी भोसा खिंडीतून सीना धरणात आवर्तन सोडत नसल्याने मंगळवारी (दि.२७) कर्जतच्या संतप्त शेतकर्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. दुष्काळ हटवण्यासाठी सरकारने या भागात सव्वाशे कोटी रूपये खर्च केले. मात्र,पाणी देण्याची तसदी घेतली नाही, असा या आंदोलकांचा आरोप आहे. मिरजगाव परिसरातील गुलाब तनपुरे, विजय पवार, संतोष जंजीरे, संपतराव बावडकर, दादासाहेब शेळके, उत्तम बनकर शंभरावर शेतकरी मोर्चात सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी संबंधित प्रश्नात लक्ष घालण्याचे आश्वासन दिले. त्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सीना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जास्त पाऊस नसल्याने ते कोरडे असते. या धरणात पाणी देण्यासाठी भोसा खिंड योजना करण्यात आली. मात्र, त्याचेही तब्बल १३ वर्षे काम चालले. या योजनेतून ओव्हरफ्लोचेही पाणी दिले जात नाही. या धरणातून अनेक गावांच्या पाणीयोजना आहेत. त्या पाण्याअभावी बंद असल्याने टँकरवर सरकारचा मोठा खर्च होतो. गेल्यावर्षी जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांनी कुकडीतून पाणी सोडण्याचे आश्वासन दिले. तरीही पाणी सोडले नाही. तुकाई चारीचा सर्व्हेही केला नाही. हे काम तातडीने सुरू करावे अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, असाही इशारा त्यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)
भोसा खिंडीतून आवर्तनासाठी मोर्चा
By admin | Updated: May 28, 2014 00:15 IST