सर्वसामान्य नागरिक लॉकडाऊनमुळे आर्थिक संकटात सापडला आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न भेडसावत असताना वीजबिलवसुलीच्या सक्तीने तो हैराण झाला आहे. एप्रिल व मे २०२१ हे सलग दोन महिने शासनाने कोरोना रोखण्यासाठी व्यवहार पूर्णतः लॉकडाऊन केेले होते. दोन महिने सर्वसामान्यांच्या हाताला काम नव्हते. वीजबिल भरले नाही म्हणून वीजकनेक्शन बंद करण्याची मोहीम महावितरणने हाती घेतली आहे. महावितरणने दोन महिन्यांच्या वीजबिलात सवलत व भरण्यास हप्ते करून देणे आवश्यक आहे. परंतु, असे न करता वीज तोडली जात आहे. शासनाची व महावितरणची ही भूमिका कायम राहिली, तर समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अबू आझमी यांच्या मार्गदर्शनाखाली शासनविरोधात तीव्र आंदोलन छेडले जाईल, असाही इशारा निवेदनात दिला आहे.
यावेळी शहराध्यक्ष समीर शेख, सचिव अब्दुल सय्यद, कार्याध्यक्ष इरफान पठाण, सोशल मीडिया अध्यक्ष जकरिया सय्यद, शहर संघटक परवेज शेख, जलील शेख, शाहिद शेख, जब्बार पठाण, युनुस पठाण आदी उपस्थित होते.