लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : नगर तालुक्यातील निंबोडी येथील दुर्घटनेतील मृत विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाखांची आर्थिक मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आहे़ तर शाळा खोल्यांसाठी विशेष बाब म्हणून निधी उपलब्ध करून देण्याबाबत शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याशी फोनवरून चर्चा झाली आहे, अशी माहिती आ़ कर्डिले यांनी पत्रकारांशी बोलताना दिली़निंबोडी येथील जिल्हा परिषदेची शाळा कोसळून सोमवारी तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला़ या दुर्देघटनेनंतर मंगळवारी सकाळीच ग्रामस्थांनी नगर- बीड रस्त्यावर रास्ता रोको केला़ दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी आ़ शिवाजीराव कर्डिले यांच्याशी दुरध्वनीवरून संपर्क साधला़ मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख व जखमींच्या उपचाराचा सर्व खर्च सरकार करील, असे त्यांनी फोनवरून कर्डिले यांना सांगितले़ फोनवर झालेल्या या चर्चेची माहिती आ़ कर्डिले यांनी आंदोलनकर्त्या ग्रामस्थांना दिली़ मुख्यमंत्र्यांच्या आश्वासानंतर ग्रामस्थांनी रास्ता रोको मागे घेतला़ मात्र जोपर्यंत शाळेची सोय होत नाही, तोपर्यंत शाळा बंदच ठेवण्याच्या निर्णयावर ग्रामस्थ ठाम असून, मुलांमध्ये भितीचे वातावरण आहे़ आ़ राहुल जगताप, जि़ प़ सदस्य संदेश कार्ले, सेनेचे जिल्हा दक्षिण जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ आदी यावेळी उपस्थित होते़