अहमदनगर : सोमवारपासून (दि.१६) प्राथमिक आणि माध्यमिक शाळेची पहिली घंटा वाजणार आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून पहिलीच्या वर्गात ५८ हजार १६३ विद्यार्थी प्रवेश करणार असून यात ३१ हजार ४१९ मुले तर २६ हजार ७४४ मुलींचा समावेश आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांचे शाळेत स्वागत करण्याची तयारी शिक्षण विभागाने केलेली आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा, यासाठी पहिल्याच दिवसापासून शिक्षक आपल्या दारी हा अभिनव उपक्रम राबविण्यात येणार आहे.जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची घटती संख्या पाहता गतवर्षी पासून शाळेच्या पहिल्याच दिवशी शिक्षण विभागाने विद्यार्थी आणि पालकांच्या स्वागताची पध्दत सुरू केली आहे. सहा ते चौदा वयोगटातील मुलांना हक्काचे प्राथमिक शिक्षण बंधनकारक केले असून, त्यासाठी या वयोगटातील शंभर टक्के मुले शाळेत यावेत, यासाठी सहा जूनपासून शैक्षणिक वर्षाला सुरूवात करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढावी यासाठी शाळा व्यवस्थापन समिती, माता- पालक संघ, युवक मंडळे, महिला मंडळे, सेवाभावी संस्था यांची मदत घेण्यात येणार आहे. प्राथमिक शाळा स्तरावर विद्यार्थी आणि शिक्षकांसमोर असंख्य प्रश्न आहेत. पहिल्याच दिवशी मोफत पाठ्य पुस्तके, गणवेश मिळतो की नाही, अनेक ठिकाणी वादळात शाळांचे नुकसान झालेले असल्याने बसायचे कुठे आदी विषय आहेत. दुसरीकडे शिक्षकांचे दोन महिन्यांपासून पगार रखडले असून पदोन्नती, नव्याने पाचवी, आठवीचे वर्ग सुरू करण्यासंदर्भात प्रशासनाकडून स्पष्ट सूचना नसल्याने गोंधळाची परिस्थिती आहे. यंदा प्राथमिक शिक्षकांच्या सुट्या टेन्शनमध्ये गेल्या. बदल्या होणार की नाहीत या चिंतेत शिक्षक असताना पदोन्नत्या रखडलेल्या आहेत. आॅनलाईन पगाराच्या नावाखाली दोन महिन्यांपासून शिक्षकांचे पगार रखडलेले आहेत. यामुळे शिक्षक बँकेने २ नंबरचे कर्ज नाकारलेले आहे. यामुळे शिक्षकांच्या अडचणी वाढलेल्या आहेत. अशा आव्हानात्मक परिस्थितीत शिक्षकांना गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करावे लागणार आहे. (प्रतिनिधी)जिल्हा परिषद शिक्षण विभागाने नव्याने पाचवी आणि आठवीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला. मात्र, शनिवार (दि.१४) याबाबत अद्यापही कोणतेच स्पष्ट आदेश शिक्षकांना देण्यात आलेले नाहीत. यामुळे शिक्षकांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. दीड महिन्यापासून पदोन्नत्या रखडलेल्या आहेत. यामुळे नवीन वर्गांना शिक्षक कोठून मिळणार. प्रशासन शिक्षकांना आधार देणार नसेल तर खासगी शाळांसोबत जिल्हा परिषद शाळा कशी स्पर्धा करणार. -संजय कळमकर, शिक्षक नेते.नव्याने सुरू करण्यात येणाऱ्या पाचवी आणि आठवीचे वर्ग गुगल मॅपिंगद्वारे करण्यात येणार आहेत. संबंधित शिक्षकांनी सरळ गटशिक्षणाधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. जिल्ह्यात सर्व पुस्तके पोहचलेले आहे. गणवेशाचे पैसे शाळा व्यवस्थापन समितीकडे पाठविण्यात आलेले आहेत.-दिलीप गोविंद, शिक्षणाधिकारी. शिक्षण विभागात पदोन्नती देताना पद्वीधर शिक्षकांना द्यावी की, बीएड् धारकांना द्यावी याबाबत वेगवेगळे मतप्रवाह आहेत. पहिल्याच दिवशी शाळेत विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळा सजवण्यात येणार आहे. सडा, रांगोळी, आंब्याचे तोरण बांधून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात येणार आहेत. शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी रविवारी दिवसभर जिल्ह्यात भेट दिली.
शाळेची वाजणार आज पहिली घंटा!
By admin | Updated: June 16, 2014 00:11 IST