अहमदनगर : आर्द्रा नक्षत्रातील दमदार पावसाच्या जोरावर जिल्ह्याच्या बहुतांशी भागातील शेतकरी सुखावला आहे. खरिपासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली असून वाफसा झालेल्या ठिकाणी पेरण्या सुरू झाल्या आहेत. गुरूवारपासून कृषी विभागाने खरीप हंगामातील पेरणीची आकडेवारी संकलित करण्यास सुरूवात केली आहे. जिल्ह्याच्या दक्षिण भागात नगर, कर्जत, जामखेड, पाथर्डी या ठिकाणी २५ हजार २९० हेक्टवर कडधान्यांची आणि ३ हजार ३६६ हेक्टवर तेलबिया पिकाची पेरणी झालेली आहे. पेरणीची टक्केवारी ७ टक्के आहे.यंदा सुरूवातीच्या टप्प्यात पावसाने ताण दिल्याने शेतकरी, बियाणे, खते आणि किटक नाशक विक्रेते अडचणीत आले होते. नगरच्या बाजारपेठेत साधारण २०० कोटी रुपयांचे बियाणे पडून होते. सर्वांच्या नजरा आकाशाकडे होत्या. मात्र, चार दिवसांपासून नगरशहरासह ग्रामीण भागात अनेक ठिकाणी दमदार पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे पेरण्याची लगबग सुरू झाली आहे. खरीप हंगामासाठी जिल्ह्यात ऊस पिकासह ५ लाख ९९ हजार हेक्टर क्षेत्र असून यात ऊस पिकाशिवाय २९ हजार ६५३ हेक्टरवर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. काही तालुक्यात पेरणीसाठी अद्याप वाफसा न झाल्याने त्या ठिकाणी पुढील आठवड्यात पेरण्याला सुरूवात होणार आहे. अकोले तालुक्यात अद्याप दमदार पाऊस नसल्याने भाताच्या लागवडी खोळंबल्या आहेत. (प्रतिनिधी)नगर तालुक्यात १ हजार ३२, कर्जत १२ हजार ४६६, जामखेड ८ हजार ७०९, पाथर्डी २ हजार १५६, श्रीगोंदा ९२७ हेक्टरवर पेरणया झालेल्या आहेत. १२ हजार १०९ हेक्टरवर तृणधान्य पीक असून याची पेरणी खरिपाच्या पेरणीत गृहीत धरण्यात येत नाही. जिल्ह्यात अवघ्या ११ हजार ७८७ हेक्टरवर उसाचे क्षेत्र आहे. हा सर्व खोडवा ऊस आहे. पीकनिहाय झालेली पेरणी (हेक्टर) बाजरी ७ हजार १३६, मका ४ हजार ९७३, तूर १ हजार ९१७, मूग ३ हजार ३०९, उडीद ७ हजार ८८१, भूईमूग ४, सुर्यफूल ३२०, यासह चारा पिके ३ हजार ३६६, कांदा पिक १५, भाजीपाला पिके ११० यांचा समावेश आहे.
शेतकऱ्यांची चाड्यावर मूठ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2016 01:25 IST