दहिगावने : शेवगाव तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांमधील शाळा व्यवस्थापन समित्यांची मुदत जून २०२० मध्येच संपली होती. मात्र, कोरोना संकटात शाळा कधी सुरू होतील हे नक्की नव्हते. यामुळे राज्य शासनाने या समित्यांच्या नव्याने निवडी न करता, शाळा सुरू होईपर्यंत आहे त्या समित्यांनाच मुदतवाढ दिली होती. मात्र, आता या समित्यांना दिलेली मुदतवाढ संपवून नवीन शाळा व्यवस्थापन समित्या तत्काळ स्थापन कराव्यात, अशी मागणी पालकांकडून केली जात आहे.
लहान बालकांना सक्तीचे आणि मोफत शिक्षण अधिनियम २००९ नुसार मिळणारे शिक्षण आनंददायी असावे. यातून सर्वगुणसंपन्न पिढी तयार व्हावी, हे प्राथमिक शिक्षणाचे मूलभूत ध्येय आहे. हे साध्य होण्यासाठी पालक-शिक्षक आणि प्रशासनात शाळा व्यवस्थापन समिती महत्त्त्वाचा दुवा म्हणून कार्य करते. ज्या शाळा व्यवस्थापन समितीचा कारभार उत्कृष्ट राहतो त्या शाळेला भौतिक सुविधा, लोकसहभाग लाभतो. शिक्षक-पालकांत समन्वय राहतो. त्यामुळे शाळेचा गुणात्मक आलेख उंचावला जातो. म्हणून शाळा व्यवस्थापन समित्यांना विशेष महत्त्व आहेच. २ वर्षे मुदतीसाठी स्थापन होणाऱ्या या समितीत शाळेतील मुलांच्या पालकांची निवड केली जाते. शेवगावातील बऱ्याचशा शाळा व्यवस्थापन समित्यांची मुदत जून २०२० रोजीच संपली होती. मात्र, कोरोना पार्श्वभूमीवर या समित्यांना मुदतवाढ देण्यात आली होती. राहिलेल्या शाळांच्या समित्यांची मुदतही जून २०२१ रोजी समाप्त होणार आहे. त्यामुळे शाळा व्यवस्थापन समित्यांच्या नव्याने निवडी करण्यात याव्यात, अशी मागणी भावीनिमगावचे सरपंच आबासाहेब काळे, उपसरपंच संतोष चव्हाण, गोविंद मुंगसे, माधव काळे, रामकृष्ण मुंगसे आदींसह पालकांनी केली आहे.
----
कोरोना प्रादुर्भाव लक्षात घेता ऑगस्ट २०२० मध्ये मुदत संपलेल्या शाळा व्यवस्थापन समिती निवडीच्या कार्यक्रमाला राज्य शासनाने सप्टेंबर २०२० मध्ये मुदतवाढ दिलेली होती. नवीन समित्यांच्या निवडीचे आदेश अद्याप प्राप्त नाहीत. आदेश येताच त्यावर तत्काळ कार्यवाही करण्यात येईल.
-रामनाथ कराड,
गटशिक्षणाधिकारी, शेवगाव
----
शाळेसंबंधी अनेक प्रश्न हे गावपातळीवरील असतात. ते सोडवण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे सहकार्य नेहमीच अधोरेखित झाले आहे. लोकसहभागातून शाळा मूलभूत, भौतिक सुविधेने संपन्न होण्यासाठी समितीने प्रयत्नशील असावे, अशी पालकांना अपेक्षा असते. मात्र, अलीकडील काळात शाळांच्या व्यवस्थापन समित्या राजकीयदृष्ट्या प्रतिष्ठेचा विषय बनत आहेत.
-रामकृष्ण मुंगसे,
पालक, भावीनिमगाव