चंद्रकांत शेळके, अहमदनगर सहा ते साडेआठ तासांचे भारनियमन, इमर्जन्सी शटडाऊनच्या नावाखाली रात्री-अपरात्री खंडित होणारी वीज अन् त्यात भरीस भर म्हणून पार्याने ओलांडलेली चाळिशी, अशा कात्रीत सापडल्याने सध्या नागरिक उष्म्याने हैराण झाले आहेत. महावितरणच्या गलथान कारभारामुळे ग्रामीण भागातील जनजीवनच जणू विस्कळीत झाले आहे. सध्या ग्रामीण भागासह सर्वत्रच भारनियमनाची अंमलबजावणी होते. मागणी व वसुलीनुसार ठरलेले ग्रुपनिहाय भारनियमन नित्यनेमाने सुरू आहे. परंतु पारा ४० अंशावर गेल्याने उष्म्याने नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळे घरगुती पंखे, वातानुकूलित यंत्रणा, फ्रिज, कुलर रात्रंदिवस सुरूच असतात. उन्हाळ्याच्या चार महिन्यांत विजेची मागणी एकदमच वाढते. त्यामुळे निर्माण झालेली तूट भरून काढण्यासाठी तातडीचे भारनियमन हा उपाय महावितरणने शोधून काढला आहे. ग्रामीण भागातील बर्याच ठिकाणी सिंगल फेजचे काम झाले असले तरी त्यांना भारनियमनातून सुटका मिळालेली नाही. सहा ते तब्बल आडेआठ तास हे नेहमीचे भारनियमन आणि वरून तातडीच्या नावाखाली कधीही, अनिश्चित काळापर्यंत खंडित होणारा वीजपुरवठा यामुळे जनजीवन विस्कळीत होत आहे. पिठाच्या चक्क्या बंद असल्याने महिलांची तारांबळ उडते. पाच-दहा किलोमीटरची रपेट करत शेजारील गावावरून दळणाची तजवीज करावी लागते. रात्री अंधाराचा फायदा घेऊन चोर्यांचे प्रमाण वाढले आहे. पाणीयोजनांचा वीजपुरवठा खंडित केल्याने ग्रामस्थांवर पाण्यासाठी भटकंतीची वेळ आली आहे. शेतकर्यांना तर वीज कधी येते न जाते हेच कळत नाही. उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवत असली तरी काही ठिकाणी पाणी टिकून आहे. भाजीपाला, चारापिके, फळबागा तगवण्याची कसरत शेतकर्यांपुढे आहे.
भारनियमनातही लादला इमर्जन्सीचा ‘भार’
By admin | Updated: May 28, 2014 00:06 IST