लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : जिल्ह्यातील शिक्षकांनी शिक्षण क्षेत्रामध्ये खूप चांगले काम केले आहे. सध्या सगळीकडे बिनविरोध निवडणुकीचे वारे सुरू आहे. तेव्हा शिक्षक बँकेची निवडणूक सुद्धा बिनविरोध झाली तर शिक्षकांचे पगार लवकर करण्यात येतील, सुट्या जादा देण्यात येतील, नियमित पगारासाठी प्रशासन सहकार्य करील. तेव्हा सर्व शिक्षक संघटनांनी याचा विचार करावा, असे मिश्किल आवाहन राज्याचे शिक्षण सहसंचालक दिनकर टेमकर यांनी केले.
प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी रमाकांत काटमोरे यांची शिक्षण उपसंचालक म्हणून बढती व बदली झाल्याबद्दल त्यांचा तसेच प्रभारी शिक्षणाधिकारी शिवाजी शिंदे, उपशिक्षणाधिकारी रमजान पठाण, नगर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी रवींद्र कापरे आदींचा जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटनांच्या वतीने शिक्षक बँकेच्या सभागृहांमध्ये सत्कार करण्यात आला.
काठमोरे म्हणाले, अनेक उपक्रम शिक्षकांच्या सहकार्याने राबविण्यात आले, याचे समाधान मला आहे. शिष्यवृत्ती परीक्षेचा गेल्या तीन वर्षांत दहा टक्के निकाल वाढला. २६ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला, असेही ते म्हणाले.
संजय कळमकर, राजू साळवे यांनी विनोदी शैलीमध्ये मतप्रदर्शन केले. सलीमखान पठाण यांच्या शेरोशायरीने कार्यक्रमात रंग भरला. यावेळी आबा लोंढे, राजू राहणे, संजय धामणे, राजू शिंदे, राजेंद्र निमसे, कल्याण लवांडे, दादा वाघ, साहेबराव अनाप, बापूसाहेब तांबे, के. आर. ढवळे, संजय पवार आदींनी मनोगत व्यक्त केले. बाळासाहेब चाबुकस्वार यांच्या पुढाकाराने सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन एक चांगला कार्यक्रम पार पाडल्याबद्दल बापूसाहेब तांबे यांनी सर्वांना धन्यवाद दिले. सूत्रसंचालन मंगेश खिलारी यांनी केले. आभार नितीन पंडित यांनी मानले.
............
केंद्रप्रमुख भरतीत ५०-५० प्रस्ताव
केंद्रप्रमुख भरतीबाबत ५० टक्के सरळ सेवा व ५० टक्के पदोन्नतीचा प्रस्ताव शासनाला दिला आहे. शाळा स्तरावर वेगवेगळ्या समित्या कमी करून फक्त शाळा व्यवस्थापन समिती व परिवहन समिती ठेवावी, अशी शिफारस केली आहे, असे शिक्षण सहसंचालक दिनकर टेमकर यांनी सांगितले.
...........
२६ शिक्षक बँक