अहमदनगर : महापालिकेच्या स्थापनेपासूनच आतापर्यंत कार्यक्षम आयुक्त न मिळाल्याने नगर शहराची वाताहत झाली आहे. नियोजनबद्ध विकासाचे व्हिजन असणारे सक्षम आयुक्त मिळाले तर शहराचा चेहरा बदलण्यास वेळ लागणार नाही. त्यासाठी कार्यक्षम आयुक्त नियुक्त करावा, अशी मागणी स्थायी समितीचे माजी सभापती संजय गाडे यांनी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे व राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे केली आहे.
२००३ मध्ये नगर महापालिकेची स्थापना झाली. तेव्हापासून आजपर्यंत पालिकेला कार्यक्षम आयुक्त मिळाले नाहीत. सेवानिवृत्ती जवळ आलेल्या अधिकाऱ्यांनाच नगरला आयुक्त म्हणून नियुक्त केले जाते. निवृत्ती जवळ आल्याने आयुक्त सक्षमपणे पदाला न्याय देत नाहीत.
यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांवरही नियंत्रण राहत नाही. तसेच शहाराच्या विकासाच्या दृष्टीने मोठे प्रकल्प व योजना नगरला येऊ शकल्या नाहीत. नियोजनबद्ध विकासाची दृष्टी असणारा कार्यक्षम अधिकारी नगरला आयुक्त म्हणून नियुक्त करावा, असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.