नेवासाफाटा : कोरमअभावी सरपंचाने मुकिंदपूर (नेवासा फाटा) ग्रामपंचायतीची रद्द केलेली ग्रामसभा ग्रामपंचायत सदस्याच्या आग्रहामुळे पुन्हा घेण्यात आली. आरोप-प्रत्यारोपांमुळे सभा वादळी झाली. समस्यांविषयी तक्रारी करुनही पाठपुरावा होत नसल्याने ग्रामस्थांनी सभेकडे पाठ फिरविली. त्यामुळे कोरमअभावी सरपंच माया ठाकर यांनी सभा तहकूब केली, मात्र ग्रामपंचायत सदस्य सतीश निपुंगे यांनी पुढाकार घेऊन तहकूब केलेली ग्रामसभा सरपंचांना पुन्हा घेण्यास भाग पाडले. ग्रामविकास अधिकारी दादासाहेब काळे यांच्या बदलीची सभेत मागणी करण्यात आली. गावाच्या विकासाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप सदस्यांसह ग्रामस्थांनी सभेत केला.रस्त्याच्या दुरुस्तीसाठी ग्रामपंचायतीकडून दखल घेतली जात नाही, मात्र ग्रामपंचायत कार्यालयासमोर पेव्हींग ब्लॉक बसविले जातात, असा आरोप अरुण देशमुख यांनी केला. गाव विकासाची कामे होत नसल्याने ग्रामविकास अधिकाऱ्याची बदली करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. गावातील बंद दिवे बदलण्यात येत नाहीत, ग्रामसभेतील ठरावाची अंमलबजावणी होत नाहीे, उडवा-उडवीचीे उत्तरे देवून मुलभूत सुविधा दिल्या जात नाहीत, अशा तक्रारी गामस्थांनी केल्या. सभेस तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष राजेंद्र वाघमारे, सतीश निपुंगे, महेश निपुंगे, अरुण देशमुख, दत्तात्रय शिरसाठ, सोपान पंडित, प्रकाश निपुंगे, प्रताप हांडे, गणेश माटे, संजय लिपाने व ग्रामस्थ मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)
आरोप-प्रत्यारोपांमुळे मुकिंदपूरच्या सभेत वादंग
By admin | Updated: October 5, 2016 00:20 IST