अहमदनगर : उन्हाळ्यात चार महिने पाण्यासाठी भटकंती करणाऱ्या वन्यप्राण्यांना वनक्षेत्रातच पाणी मिळावे, यासाठी वनविभागाने गेल्या दोन ते तीन वर्षांत ४० लाख रुपयांचा खर्च करत पाणवठे तयार केले़ या पाणवठ्यांत मात्र, नियमित पाणी टाकण्यासाठी वनविभागाकडे स्वतंत्र निधीची तरतूद नाही़ तसेच या पाणवठ्यांमध्ये पाणी टाकले जाते की नाही, याबाबत उपवनसंरक्षक हेच अनभिज्ञ आहेत़ दुष्काळामुळे वनक्षेत्रातील जलसाठे आटल्याने वन्यजीवांची पाण्यासाठी ससेहोलपट होत आहे. जंगलातील पशु-पक्ष्यांना लागणाऱ्या पाण्याचे नियोजन करण्याचे काम वनविभागाचे असले, तरी वनविभाग त्याकडे गांभीर्याने पाहत नसल्याचे समोर आले आहे़ पाण्यासाठी भटकंती करणारे हरणांचे कळप रस्त्यावर येऊन अपघातात मृत्यू होण्याच्या घटना वाढल्या आहेत़ जिल्ह्यात बिबट्यांचे हल्लेही वाढले आहेत़ वनविभागाने जिल्ह्यात पारनेर, राहुरी, श्रीगोंदा, कर्जत, पाथर्डी, नगर, कोपरगाव, जामखेड आदी तालुक्यांत मागील दोन वर्षांत ३९ पाणवठे तयार केले आहेत़ एक पाणवठा तयार करण्यासाठी ८० ते ९० हजार रुपयांची तरतूद आहे़ या पाणवठ्यांत पाणी टाकण्यासाठी मजूर कल्याण व आकस्मिक निधी वापरला जातो़ प्रत्यक्षात मात्र, जिल्ह्यातील पाणवठ्यांमध्ये पाणी टाकले जाते की नाही, वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना पाण्यासाठी निधीची तरतूद झाली की नाही, सध्या किती पाणवठे भरले जातात, याची कुठलीही माहिती मुख्य कार्यालयात बसलेल्या उपवनसंरक्षकांना नाही़ तसेच तालुक्यातील वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनाही याबाबत कुठलाही अहवाल उपवनसरंक्षकांना पाठविलेला नाही़ वनक्षेत्र व तेथील वन्यजीवांच्या रक्षणाची जबाबदारी वनविभागाची असते़ प्रत्यक्षात मात्र, हा विभाग किती गांभीर्याने काम करतो, हे स्पष्ट होत आहे़ (प्रतिनिधी)वन्यप्राण्यांसाठी वनविभागाने जिल्ह्यात विविध ठिकाणी पाणवठे तयार केले आहेत़ या पाणवठ्यांमध्ये पाणी टाकण्यासाठी विभागाकडे निधीची तरतूद नाही़ मजूर कल्याण व आकस्मिक निधी यासाठी वापरला जातो़ तालुक्यातील वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांकडे पाणवठ्यांत पाणी टाकण्याची जबाबदारी आहे़ ते नियमित पाणी टाकतात की नाही, याबाबत आमच्याकडे काहीच माहिती नसते़ तसेच याबाबत अहवाल पाठविला जात नाही़ -जी़ डी़ वळसे, उपवनसंरक्षक
वनविभागाचे पाणवठे झाले कोरडे
By admin | Updated: March 1, 2016 23:32 IST