लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर: जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी इच्छुकांची संख्या मोठी असल्याने बिनविरोधच्या वाटेत अनेक अडथळे आहेत. त्यामुळे निर्णय काहीही होवो, मतदार ताब्यात घ्या, असा आदेश उमेदवारांनी कार्यकर्त्यांना दिले असून, कर्जतसह इतर तालुक्यातील मतदारांना सहलीला रवना झाल्याची चर्चा राजकीय वर्तळात आहेत.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी शेतीपूरक, बिगर शेती, इतर मागास प्रवर्गातून अनेकजण इच्छुक आहेत. तसेच विकास सेवा सहकारी संस्था मतदारसंघातून कर्जत, नगर, श्रीगोंदा आणि श्रीरामपूर तालुक्यात बिनविरोधची समीकरणे अजूनतरी जुळलेली नाहीत. माघारीनंतर खऱ्या अर्थाने निवडणुकीला सुरुवात होणार आहे. प्रतिस्पर्धी उमेदवाराने ऐनवेळी माघार घेतली नाही, तर पुढची तयारी करावी लागेल. तशी तयारी उमेदवारांकडून केली जात आहे. विरोधकांना मतदार शोधूनही सापडणार नाहीत, अशी व्यवस्था काही उमेदवारांनी केली आहे. श्रीरामपूर तालुक्यात करण ससाणे व भानुदास मुरकुटे यांच्यात अद्याप समझोता झालेला नाही. उद्या गुरुवारी काय निर्णय होईल ते सांगता येत नाही, त्यामुळे खबरदारी म्हणून मुरकुटे व ससाणे यांनी तालुक्यातील मतदारांना मतदारांशी संपर्क करणे सुरू केला आहे. श्रीगोंदा तालुक्यात राष्ट्रवादीकडून माजी आमदार राहुल जगताप हे बिनविरोधसाठी प्रयत्नशील आहेत. परंतु, वैभव पाचपुते यांचा माघारीचा निर्णय झालेला नाही. श्रीगोंदा तालुक्यातून बिनविरोध न झाल्यास तेथील मतदारांना सुगीचे दिवस येणार आहेत.
...
शेतीपूरक, बिगर शेती, इतर मागास प्रवर्गात चुरस
शेतीपूरकमधून आमदार अशुतोष काळे यांच्यासह १९ अर्ज आहेत. माजी आमदार वैभव पिचड यांचाही शेतीपूरकमधून एक अर्ज आहे. बिगर शेतीमधून आमदार अरुण जगताप, संग्राम जगताप, माजी आमदार पांडुरंग अभंग, दत्ता पानसरे, यांच्यासह २५ अर्ज आहेत. इतर मागास प्रवर्गातून अण्णासाहेब शेलार, करण ससाणे, भगवान फुलसौंदर, विठ्ठल लंघे यांच्यासह ३१ अर्ज आहेत. या तिन्ही मतदारसंघात इच्छुकांची संख्या मोठी असल्याने चुरस रंगणार आहे.