आढळगाव : श्रीगोंदा तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये तीव्र टंचाईमुळे युरियासाठी शेतकऱ्यांची भटकंती सुरू होती. शेतकऱ्यांच्या मागणीमुळे २५९ मेट्रिक टन युरियाचा राखीव साठा वितरणास सुरुवात झाली आहे. कृषी विभागाने केलेल्या नियोजनामुळे तसेच या आठवड्यात दोन कंपन्यांकडून कृषी सेवा केंद्रात युरिया उपलब्ध होणार असल्यामुळे टंचाई कमी होण्यास मदत होणार आहे.
तालुक्याच्या सर्वच मंडळांमध्ये पाऊस सुरू झाल्यामुळे युरियाची मागणी वाढली होती. तालुक्यात उसाचे क्षेत्र मोठे असल्यामुळे ऊस बांधणीसाठी खतांची मागणी असते तसेच बाजरी आणि मक्यासह अन्य चारा पिकांसाठी युरियासाठी शेतकऱ्यांची धावाधाव सुरू होती. कृषी सेवा केंद्रांमधून युरिया गायब झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला होता.
आढळगाव, कोकणगाव, भावडी, घोडेगावसह तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकरी भीमा नदी पट्ट्यामध्ये युरियाची शोधाशोध करत होता. मिळेल तेथून युरिया आणण्याची कसरत शेतकऱ्यांना करावी लागत होती. तीव्र टंचाईमुळे युरियाबरोबर अन्य खतांची सक्ती शेतकऱ्यांना केली जात असल्याच्या तक्रारी कृषी विभागाकडे वाढल्या होत्या. या सर्व अडचणी लक्षात घेऊन कृषी विभागाकडून युरियाचा २५९ मे. टन राखीव साठा वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
---
शेतकऱ्यांनी युरिया साक्षर व्हावे. राखीव साठा वितरणास सुरुवात झाली असली तरीही युरियाचा योग्य प्रमाणातच वापर करावा. सध्या पाऊस सुरू असल्यामुळे नत्र स्थिरीकरण होत आहे. एकदाच मुबलक खते दिल्यास पिकांची कायिक वाढ होऊन किडींचे प्रमाण वाढण्याची शक्यता असल्यामुळे दोन-तीन टप्प्यांत रासायनिक खते देण्याची गरज असते. युरियाचे वितरण कृषी सहायकांच्या उपस्थितीत करण्याचे नियोजन केले आहे.
-पद्मनाभ म्हस्के,
तालुका कृषी अधिकारी, श्रीगोंदा