अहमदनगर : जिल्हाभरातून कोरोनाचे गंभीर रुग्ण उपचारासाठी नगर शहरात दाखल होत असून, मयतांची संख्याही वाढली आहे. त्यामुळे अमरधाम येथील यंत्रणेवर ताण येत असून, केडगाव व रेल्वेस्टेशन येथील स्मशानभूमीत विद्युत दाहिन्या बसविण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी महापौर बाबासाहेब वाकळे यांनी पालकमंत्र्यांकडे निवेदनाव्दारे केली आहे.
महापौर बाबासाहेब वाकळे यांनी पालकमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांवर नालेगाव अमरधाम येथे अंत्यसंस्कार केले जात आहेत. मृतांची संख्या वाढल्याने तिथे जागा अपुरी पडते. अमरधाम येथे दोन विद्युत दाहिन्या आहेत. परंतु, त्याही कमी पडू लागल्या असून, अंत्यविधीसाठी उशिर लागतो. महापालिकेच्या केडगाव व रेल्वेस्टेशन रोड परिसरात स्मशानभूमी आहेत. त्याठिकाणी विद्युत दाहिन्या बसविण्यासाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती अभियानातून निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.