अकोले: तालुक्यात पवन ऊर्जा निर्मितीने बाळसे धरले असले तरी भारनियमनाचे सावट अद्याप कायम आहे. अकोलेच्या वायव्य पट्ट्यातील ङोंगरमाथ्यावरील ‘विंडविल’ प्रकल्पातून ५० मेगावॅट वीज मिळत असली तरी आढळा खोऱ्यातील अंधार मात्र दूर झालेला नाही. शिवाय आदिवासी भागातील बेरोजगारांना या प्रकल्पाकडून असलेली रोजगाराची अपेक्षाही फोल ठरली आहे. सध्या तालुक्यात खिरविरे-कोंभाळणे, नायकरवाडी-पागिरवाडी मुथाळणेच्या डोंगरमाथ्यावर पवन ऊर्जा प्रकल्पाचे खांब उभारले गेले आहेत. यातून १०० मेगावॅट वीज निर्माण होणे अपेक्षित आहे. यात पहिल्या टप्प्याच्या ५० मेगावॅट वीज निर्मितीस सुरुवात झाली आहे. एका खासगी वीज निर्मिती कंपनीचे हे पंखे आहेत. कंपनीने तलवार कानडी समाजाच्या शेतकऱ्यांकडून अवघ्या एकरी १ लाख ३० हजार रुपये किमतीने या माळरान जमिनी तीन-चार वर्षांपूर्वी खरेदी केल्या. तसेच कंपनीत ‘कामाला घेऊ’ असे तोंडी आश्वासन दिले होते. मात्र ते फोल ठरले. दरम्यान, तालुक्यातील वीज टंचाई कायम असून ग्रामीण भागात आजही चार ते सहा तास भारनियमन असते. विंडविल परिसरातील बेरोजगारांना अपेक्षित रोजगार उपलब्ध झाला नसल्याचे बोलले जात आहे. (तालुका प्रतिनिधी) अकोल्याच्या वायव्य पट्ट्यातील डोंगरमाथ्यावर ‘विंडविल’चा ५० मेगावॅट वीजनिर्मितीचा प्रकल्प आहे.
अकोल्यात दिव्याखाली अंधार
By admin | Updated: October 29, 2014 23:57 IST