अहमदनगर: स्पर्धेच्या युगात आपला पाल्य कुठेही कमी पडू नये, याची काळजी पालक वर्गातून नेहमीच घेतली जाते. परंतु अलिकडच्या काळात त्यात जरा जास्तच भर पडली आहे. दर्जेदार शाळेत प्रवेश मिळाला तरी खासगी शिकवण्या लावण्याचे प्रमाण वाढले असून, मोठ्या शहरांप्रमाणे नगरमध्येही पालकांची ही जागृकता दिसून येत आहे. ‘लोकमत’ने याबाबत एक सर्व्हेक्षण केले. त्यात बऱ्याचशा पालकांनी मुलांचा घरी अभ्यास होत नसल्याचे, तर काहींनी अभ्यास घ्यायला वेळ नसल्याचे स्पष्ट केले आहे. मुलांना खासगी शिकवणी लावण्याचे वाढते प्रमाण पालकवर्गात दिसत आहे. चांगली शाळा त्याचबरोबर चांगली शिकवणीची निवड करण्यातही पालकांची कसरत पाहायला मिळते. शाळा सुरू झाल्या, की खासगी शिकवण्यांसाठी पालकांची धावपळ सुरू होते. खासगी शिकवणींचे वाढते प्रमाण लक्षात घेता, मुलांना खासगी शिकवणी लावण्याची कारणे शोधण्यासाठी ‘लोकमत’ने सर्व्हेक्षण केले. यामध्ये विविध भागांतील पालकांची मते जाणून घेण्यात आली. या सर्वेक्षणानुसार शहरातील जवळपास ७५ टक्के पालकांनी आपली मुले खासगी शिकवणीला जात असल्याचे सांगितले. त्यामुळे शहरातील खासगी शिकवणीचालकांना सध्या चांगलाच भाव मिळत असल्याचे दिसून येते. तब्बल ५० टक्के पालकांनी मुलांचा घरी अभ्यास होत नसल्याने शिकवणी लावल्याचे स्पष्ट केले. तर ३२ टक्के पालकांना अभ्यास घेण्यास वेळ मिळत नाही. दोन्हींचा विचार केल्यास एकूण तब्बल ७२ टक्के पालक मुलांच्या अभ्यासासाठी वेळ देऊ शकत नसल्याचे स्पष्ट होते.काही पालकांनी शाळेव्यतिरिक्त मुलांचा आणखी चांगला अभ्यास व्हावा, यासाठी शिकवणी लावल्याचे स्पष्ट केले. तसेच, बदललेला अभ्यासक्रम कठीण असल्याने शिकवणीला टाकल्याचे पालकांनी व्यक्त केले. गेल्या काही वर्षांत अभ्यासक्रमात बरेचसे बदल झाल्याने त्या बदलत्या अभ्यासक्रमाशी जुळवून घेणे कठीण असल्याने पालक मुलांसाठी शिकवणी हा पर्याय निवडताना आढळून आले. मुले आपले ऐकत नाहीत, असे सांगणारे पालकही या सर्व्हेक्षणानिमित्ताने पुढे आले आहेत. शिवाय इतर मुलांनी शिकवणी लावली, त्याच्या स्पर्धेत आपला पाल्य मागे राहू नये, या कारणाने शिकवणी लावलेलेही काही पालक आढळून आले. (प्रतिनिधी)मुलांना खासगी शिकवणी का लावली, या प्रश्नाचे उत्तर देताना तब्बल ५० टक्के पालकांनी मुलांचा घरी अभ्यास होत नसल्याचे स्पष्ट केले. तर, ३२ टक्के पालकांना अभ्यास घेण्यास वेळ मिळत नाही. मुलांचा घरी अभ्यास होत नाही, हेही पालकांना मुलांच्या अभ्यासाकडे पूर्ण वेळ देता येत नाही, याचेच चिन्ह आहे. त्यामुळे दोन्हींचा विचार केल्यास एकूण तब्बल ७२ टक्के पालक आपल्या मुलांच्या अभ्यासासाठी वेळ देऊ शकत नसल्याचे स्पष्ट होते.विशेष म्हणजे १० टक्के पालकांनी शाळेत व्यवस्थित शिकवत नसल्याचेही कारण दिले आहे. उजळणी गरजेची...इंग्रजी माध्यमाला पसंती मिळू लागली. शिक्षणाचा खर्च वाढत गेला. आई-वडील दोघांनाही नोकरीच्या निमित्ताने घराबाहेर जावे लागले. चांगल्या शाळांमध्ये मुलांना घातले असले, तरी घरी त्यांची उजळणी घेणे गरजेचे असतेच. बदलत्या परिस्थितीनुसार पालकांना मुलांच्या अभ्यासाकडे पुरेसे लक्ष देणेही शक्य होत नाही. त्यामुळे खासगी शिकवण्याकडे पालकांचा ओढा वाढला. बदलत्या काळानुरूप पालक जागृकशिक्षणाबाबत सध्याच्या काळात पालकवर्गात फार जागृकता आली आहे. अडाणी पालकही आपल्या मुलांना उत्तमोत्तम शिक्षण देण्यासाठी धडपड करत असतात. स्पर्धेचे युग असल्याने विद्यार्थी व पालकांत बदल दिसून येत आहे.
उदंड जाहल्या शिकवण्या..!
By admin | Updated: June 28, 2014 01:12 IST