संगमनेरचे नगराध्यक्षपद सर्वसाधारण गटासाठी आरक्षित झाल्याने अनेकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. कॉंग्रेसकडून विद्यमान नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे या जोरदार दावेदार मानल्या जात आहेत. मात्र कॉंग्रेसमधीलच अनेकजण या उमेदवारीसाठी इच्छूक आहेत. उद्योजक मनीष मालपाणी, माजी उपनगराध्यक्ष नीलेश जाजू, गजेंद्र अभंग, जयवंत पवार, दिलीप पुंड, प्रा. एस. झेड. देशमुख अशा विविध नावांची चर्चा सुरु झाली आहे. संगमनेरात यापूर्वीही थेट जनतेमधून नगराध्यक्षांची निवड झालेली आहे. सुमारे ३० वर्षांपूर्वी नूरमोहंम्मद शरफोद्दीन शेख ऊर्फ नुरू मामा हे थेट जनतेतून निवडून आले होते. त्यावेळी त्यांनी स्व. ओंकारनाथ मालपाणी यांचा पराभव केला होता. त्यानंतर १५ वर्षांपूर्वी अतिशय अटीतटीच्या लढतीत काँग्रेसचे विश्वास मुर्तडक यांनी राष्ट्रवादीच्या सोमनाथ अभंग व भाजपच्या ज्ञानेश्वर कर्पे यांचा पराभव केला होता. यावर्षी पुन्हा जनतेमधून नगराध्यक्ष निवडला जाणार आहे. सत्ताधारी काँग्रेसकडून उमेदवारीचा अंतिम निर्णय आमदार बाळासाहेब थोरात हेच घेणार आहेत. माजी नगरसेवक जयवंत पवार, नगरसेवक गजेंद्र अभंग, दिलीपराव पुंड हे या पदासाठी इच्छूक असल्याचे बोलले जाते. माजी नगरसेवक नीलेश जाजू यांची मनिषा लपून राहिलेली नाही, त्यामुळे ऐनवेळी ते कोणाताही निर्णय घेऊ शकतात. माजी उपनगराध्यक्ष किशोर कालडा यांच्याही नावाची चर्चा सुरू झाली आहे. मागील वेळी शिवसेना, भाजप व राष्ट्रवादीने मिळून सत्ताधाऱ्यांना शह देण्याचा प्रयत्न केला. यावेळी मात्र विरोधकांत एकी राहते की नाही याबाबत साशंकता आहे. शिवसेना व भाजपची जरी युती झाली, तरी राष्ट्रवादीची भूमिका गुलदस्त्यात आहे. शिवसेनेकडून कैलास वाकचौरे, संजय फड, अमर कतारी, आप्पा केसेकर, तर भाजपकडून राजेश चौधरी, ज्ञानेश्वर करपे, भरत फटांगरे, राधावल्लभ कासट, अॅड. श्रीराम गणपुले प्रा. एस. झेड. देशमुख आदी प्रमुख नावांची चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादीकडून अमोल खताळ, अविनाश थोरात, कपिल पवार अशी नावे पुढे येऊ शकतात. पक्षांनी उमेदवारी न दिल्यास काही अपक्ष चेहरेही निवडणुकीत समोर येण्याची शक्यता आहे. नगरसेवकांपेक्षा नगराध्यक्षपदाचा उमेदवार ठरविणेच अवघड आहे.
सत्ताधाऱ्यांतही इच्छुकांची गर्दी
By admin | Updated: October 7, 2016 00:49 IST