कुळधरण : कर्जत तालुक्यात नव्याने पेरणी केलेली पिके पाण्याअभावी सुकू लागल्याने शेतकऱ्यांची समस्या दिवसेंदिवस बिकट बनत आहे.गेल्या महिन्यात झालेल्या दोन मध्यम पावसावर कुळधरण, राशीन, राक्षसवाडी आदी भागातील काही शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. मका, कपाशी, कांदा, भेंडी, बाजरी आदी पिकांची लागवड करण्यात आली. मात्र आता रिमझीम पावसानेही उघडीप दिल्याने पिके सुकू लागली आहेत. पावसाच्या आशेवर शेतकऱ्यांनी बियाणे, खते तसेच मशागतीवर खर्च करून पीक लागवड केली. श्रावणातील सरींनी पिके जगतील अशी आशा होती. मात्र आता विहिरी, बंधारे, कुपनलिका कोरड्या पडल्याने पिके धोक्यात आली आहेत. त्यामुळे अनेक भागात पाणीप्रश्न गंभीर बनला आहे. करमनवाडी, राक्षसवाडी, पावणेवाडी येथे महिलांची पाण्यासाठी दूरवर पायपीट सुरू आहे. सध्या पिण्यासाठी कुकडीचे आवर्तन सुटले आहे. मात्र पिकांची स्थिती बिकट झाल्याने शेतीसाठी कुकडीचे आवर्तन सोडावे अशी मागणी जोर धरु लागली आहे. (वार्ताहर)
पाण्याअभावी पिके सुकली
By admin | Updated: August 9, 2014 23:33 IST