श्रीगोंदा : पक्ष सोडण्यासाठी आपल्याविरोधात षडयंत्र करण्यात आले. मी जर तोंड उघडले तर षडयंत्र रचणारांची पळताभुई थोडी होईल, असा टोला आ.बबनराव पाचपुते यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार व पालकमंत्री मधुकर पिचड यांना मारला. श्रीगोंदा येथे शुक्रवारी झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात राष्ट्रवादी पक्ष सोडल्याचे त्यांनी जाहीर केले. त्यांनी पवार काका-पुतण्यासह पिचड यांच्यावर टीका केली.आगामी विधानसभा अपक्ष अथवा भाजपाच्या तिकीटावर लढण्याचा कार्यकर्त्यांनी मेळाव्यात निर्धार केला. आ. पाचपुते म्हणाले, २००४ च्या विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर युतीच्या नेत्यांनी चार आमदार घेऊन या, तुम्हाला मुख्यमंत्री करतो, अशी आॅफर दिली होती. परंतु शरद पवारांना आपण पाठिंबा दिला. मी काका-पुतण्यांना कुकडीचे पाणी, रस्त्यासंदर्भात अडचणी सांगितल्या. मी पक्ष सोडणार अशी चर्चा त्यांच्या कानावर गेली, परंतु त्यांनी मला साधा फोन सुद्धा केला नाही, याचे मला दु:ख झाले. मी लोकसभा निवडणुकीत राजीव राजळे यांचे जबाबदारीने काम केले. वास्तव परिस्थिती समजून न घेता पालकमंत्री मधुकर पिचड यांच्या सांगण्यावरून मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. मला शरद पवार यांनी खूप दिले. मीही पक्षासाठी अहोरात्र काम केले. मला उमेदवारीसाठी सहा तास दारात बसविले. कारखान्याचे मंजूर झालेले कर्ज अडविले. पक्षात मानसन्मान मिळाला नाही. मी जितेंद्र आव्हाड यांना पक्षात घेतले आणि ते माझ्या विरोधात चुकीचे बोलले. धनगर समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मी मागणी केली. परंतु आमच्या विरोधात चुकीची माहिती नेत्यांना दिली, असा आरोप त्यांनी केला. (तालुका प्रतिनिधी)
राष्ट्रवादीतून काढण्यासाठी षडयंत्र
By admin | Updated: August 17, 2014 00:03 IST